नवी दिल्ली,दि.17: पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी भाजपा नेत्यांना मुस्लीम समाजाबाबत महत्वाचा सल्ला दिला आहे. भारतीय जनता पक्षाच्या (भाजपा) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या दुसऱ्या दिवशी पंतप्रधान मोदी यांनी भाजपा नेत्यांना संबोधित केलं. PM Narendra Modi Address To BJP National Executive Meet यात पंतप्रधानांनी भाजपा नेत्यांना मुस्लिम समाजाबाबत विचारपूर्वक विधान करण्याचा सल्ला दिला आहे. “मुस्लिम समाजाबाबत चुकीची विधानं अजिबात करू नका. भारत सध्या सर्वोत्तम काळाचा अनुभव घेत आहे आणि अशात आपण मेहनतीच्याबाबत कुठेच मागे पडता कामा नये. प्रयत्नांची पराकाष्ठा करा. विविध ठिकाणी जाऊन लोकांना भेटा. राष्ट्रवादाची ज्योत प्रत्येक ठिकाणी तेवत राहिली पाहिजे”, असं मोदी म्हणाले.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही तयारी… | Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी भाजपा नेत्यांना देशातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरही तयारी करण्यास सांगितलं. “संपूर्ण ताकदीनं निवडणुकीच्या तयारीला लागा. मेहनतीच्या बाबतीत आपण कुठेही कमी पडता कामा नये. भाजपा आता फक्त राजकीय आंदोलन नव्हे, तर सामाजिक आंदोलनात बदललं गेलं पाहिजे. अमृतकाळाचे परिवर्तन कर्तव्यकाळात करायला हवं. आता सामाजिक पातळीवर आपली भूमिका खूप महत्वाची आहे”, असं मोदी म्हणाले.

आपल्याला पूर्ण ताकदीनं प्रयत्न सुरू करायला हवेत
पंतप्रधान मोदींनी यावेळी कार्यकर्त्यांना एक टास्क देखील दिलं आहे. “सीमेलगतच्या गावांमध्ये संघटन आणखी मजबूत करायला हवं. निवडणुकीला अजूनही 400 दिवस बाकी आहेत आणि आपल्याला पूर्ण ताकदीनं प्रयत्न सुरू करायला हवेत”, असं मोदी म्हणाले.
आता धरती बचाओ अभियान चालवावं लागणार आहे
18 ते 25 वयोगटातील युवांना भारताच्या राजकीय इतिहासाला जवळून पाहिलेलं नाही. याआधीच्या सरकारमध्ये झालेला भ्रष्टाचार आणि चुकीच्या कामांची माहिती त्यांना नाही. यासाठी आपण त्यांना जागरुक करणं आणि भाजपाच्या सुशासनाची माहिती देणं गरजेचं आहे. ज्यापद्धतीनं आपण बेटी बचाओ अभियान यशस्वी केलं त्याचपद्धतीनं आपल्याला आता धरती बचाओ अभियान चालवावं लागणार आहे, असं मोदी म्हणाले.