नवी दिल्ली,दि.29: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. याचिकाकर्त्याने उत्तर प्रदेशमध्ये निवडणूक प्रचार सभेला संबोधित करताना पंतप्रधान मोदींवर आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप केला होता. वकील आनंद एस जोंधळे यांनी दाखल केलेल्या याचिकेत पंतप्रधानांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवण्याची मागणी करण्यात आली होती.
न्यायमूर्ती सचिन दत्ता यांच्या एकल खंडपीठाने सांगितले की, याचिकाकर्त्याने आदर्श आचारसंहितेचे उल्लंघन झाल्याचे ‘आधीच मान्य केले आहे. सर्वोच्च न्यायालय निवडणूक आयोगाला कोणत्याही तक्रारीवर विशेष मत घेण्याचे निर्देश देऊ शकत नाही. याचिकाकर्त्याने आधीच निवडणूक आयोगाकडे संपर्क साधला असून आयोग त्यांच्या तक्रारीचा स्वतंत्रपणे विचार करू शकतो, असे न्यायालयाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाची बाजू मांडणारे वकील सिद्धांत कुमार यांनी दिलेल्या युक्तिवादात तक्रारीची दखल घेऊन कारवाई केली जाईल आणि त्यासंदर्भात आवश्यक आदेश दिले जातील, असे म्हटले आहे.
मोदींवर कोणते आरोप?
आनंद यांनी त्यांच्या याचिकेत म्हटले होते की, पीएम मोदींनी 6 एप्रिल रोजी उत्तर प्रदेशातील पिलभीत येथे निवडणूक रॅलीमध्ये हिंदू देवता आणि शीख गुरूंचा उल्लेख केला होता. पिलभीतमधील भाजप उमेदवार जितिन प्रसाद यांच्या समर्थनार्थ रॅलीदरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले होते, ‘राम मंदिर प्राणप्रतिष्ठेचे निमंत्रण नाकारून त्यांनी राम लल्लाचा अपमान केला. या कार्यक्रमात सहभागी झालेल्या त्यांच्या पक्षातील लोकांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित करण्यात आले. इंडिया आघाडीमध्ये समाविष्ट असलेल्या पक्षांनी अयोध्येत राम मंदिराच्या उभारणीचा नेहमीच तिरस्कार केला आहे.’
ते पुढे म्हणाले की, इंडिया गटाने ‘शक्ती’ नष्ट करण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधींच्या विधानाचा संदर्भ देत पीएम मोदी म्हणाले होते, ‘काँग्रेसने आज ज्या शक्तीची देशभरात पूजा केली जात आहे तिचा अपमान केला आहे. शक्तीपूजक काँग्रेसला कधीही माफ करणार नाही. खरं तर, भारत जोडो न्याय यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने काँग्रेसने 17 मार्च 2024 रोजी मुंबईतील शिवाजी पार्कवर रॅली आयोजित केली होती. या सभेत राहुल गांधी म्हणाले होते, ‘हिंदू धर्मात शक्ती हा शब्द आहे. आम्ही शक्तीशी (भाजप) लढत आहोत, आम्ही एका शक्तीशी लढत आहोत. आता प्रश्न पडतो की ती शक्ती कोणती? इथे कोणीतरी म्हटल्याप्रमाणे – राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. बरोबर, बरोबर. राजाचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. भारतातील प्रत्येक संस्थेत आहे. ते ईडीमध्ये आहेत, ते सीबीआयमध्ये आहेत, ते प्राप्तिकर विभागात आहेत.