मुंबई,दि.१: हमाम में सब नंगे है, असे सांगत काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. अशी टीका शिवसेनेचे संजय राऊत यांनी केली आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री नवाब मलिक यांनी एनसीबीचे समीर वानखेडे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी सातत्याने समीर वानखेडे यांच्यावर आरोप केले आहेत. नवाब मलिक यांनी आज अमृता फडणवीस यांचा फोटो ट्विट करत खळबळ उडवून दिली आहे. यानंतर नवाब मलिक यांनी विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हेच ड्रग्जच्या खेळाचे मास्टरमाइंड आहेत असे म्हटले होते.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्यावर पलटवार केला आहे. नवाब मलिक यांनी लवंगी फटाका फोडला आता मी दिवाळीनंतर बॉम्ब फोडणार आहे असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नवाब मलिकांवर टीकास्त्र सोडत भाजप नेते किरिट सोमय्या यांनी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. यावर आता शिवसेना नेते, खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी भाजपवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. हमाम में सब नंगे है, असे सांगत काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये. आमच्याही हातात दगड असू शकतात, असा जोरदार टोला खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे.
खासदार संजय राऊत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलत होते. यावेळी राऊत यांनी कार्डिलिया क्रूझ ड्रग्ज पार्टी प्रकरणावरून राज्यात सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांवर भाष्य करत भाजपवर हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्रात आज एकमेकांवर आरोप करणे सुरू आहे, एकमेकांना खोट्या आरोपात फसवणे सुरू आहे, तसेच केंद्रीय चौकशी समितीचा गैरवापर करणे सुरू आहे, असे राजकारण महाराष्ट्रात कधीही झालेले नाही, असे या पूर्वी कधीही घडलेले नाही, असे राऊत म्हणाले. महाराष्ट्रात हे राजकारण दोन वर्षात सुरू झाले आहे, मात्र हे महाराष्ट्राचे राजकारण नाही, असे राऊत म्हणाले.
भाजपवर टीका करताना राऊत पुढे म्हणाले की, राजकारण म्हटले की हमाम में सब नंगे होते है. मलिक यांनी काही पुरावे दिले आहेत. ज्यांचे घर काचेचे आहे अशा लोकांनी इतरांवर मुळीच दगडफेक करू नये, कारण आमच्याही हातात एक दगड असू शकतो. मात्र, आम्ही तुमच्या इतके खालच्या पातळीवर येणार नाही आणि आम्ही कमरेखाली वार कधीही केला नाही. कारण आम्ही पवारांचे संस्कार असलेले राजकारण केले आहे.