सोलापूर,दि.१ एप्रिल २०२२: कोरोनाच्या निर्बंधासंदर्भात राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. गुढीपाडवा म्हणजे नववर्षाची सुरुवात. जुनं ते मागे सारुन नवीन कार्याचा प्रारंभ करणारा हा दिवस. गेल्या दोन वर्षापासून आपण कोरोनाच्या भयंकर विषाणूचा यशस्वीरित्या मुकाबला केला आणि आज हे सावट दूर होताना दिसते. एक नवीन सुरवात करण्यासाठी म्हणून आपत्ती व्यवस्थापन कायदा तसेच साथरोग प्रतिबंधक कायद्यान्वये कोरोना काळात लावण्यात आलेले निर्बंध गुढीपाडव्यापासून (२ एप्रिल) पूर्णपणे उठवण्यात येत आहेत, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घोषित केले.
सार्वजनिक आरोग्य विभाग, मंत्रालय, मुंबई यांचेकडील पत्र दि. १४ मार्च, २०२० अन्वये कोरोना विषाणूचा ( कोव्हीड -१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ मधील तरतुदींच्या अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमीत करणेत आलेली होती. आणि त्याबाबतची नियमावली प्रसिध्द केली असून, महानगरपालिका आयुक्त हे त्यांचे कार्यक्षेत्रात कोविड – १९ वर नियंत्रण आणण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाय योजना करणे आवश्यक आहे. त्या करण्यासाठी सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आलेले आहे. मागील काही महिन्यात नव्याने आढळून येणाऱ्या कोविड १९ रुग्ण संख्येत प्रभावी घट झालेली असल्याने शासनाकडील संदर्भ क्र. ११ चे आदेशानुसान कोविड १९ विषाणूच्या फैलावावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणेच्या अनुषंगाने लागू करण्यात आलेले निर्बंध मागे घेणेबाबत निर्देश जारी केलेले आहे. त्यामुळे सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी संदर्भ क्रमांक ३ च्या अधिसुचनेव्दारे त्यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार शासनाकडील प्राप्त निर्देशास अनुसरुन सोलापूर शहर हद्दीतील सर्व निर्बंध दि.०१ / ०४ / २०२२ रोजी रात्री ००.०० वाजल्यापासून मागे घेणेबाबत खालीलप्रमाणे निर्देश जारी केलेले आहेत.
१ ) कोव्हिड -१९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी या कार्यालयाकडून यापुर्वी लावण्यात आलेले सर्व निर्बंध दिनांक ०१/०४/२०२२ पासून लागू राहणार नाहीत.
२ ) स्थानिक आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी कोव्हिड १९ विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ अंतर्गत लागू केलेले सर्व निर्बंध मागे घेण्याची कार्यवाही करण्यात येत आहे.
३ ) आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत कोव्हिड १९ नियंत्रणाशी संबंधीत तसेच लसीकरणाच्या संबंधीत विभागांनी केंद्र शासनाच्या गृह विभागाकडील दिनांक २२/०३/२०२२ रोजीचे पत्र तसेच आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाकडील दिनांक २३/०३/२०२२ रोजीचे पत्रातील निर्देशाचे काटेकोरपणे पालन करणे आवश्यक आहे.
४ ) सर्व नागरिक, आस्थापना व संस्था यांना सुचित करण्यात येते की, मास्क घालणे, सामाजिक अंतर राखणे इत्यादीसह कोव्हिड प्रतिबंधक वर्तन हेच वैयक्तिक व सामाजिक आरोग्यासाठी आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे.
५ ) साथ रोगाच्या उद्रेकाबाबतची परिमाणे यामध्ये प्रतिदिवशी आढळून येणाऱ्या नवीन रुणांची संख्या, उपचाराधीन रुग्णांची संख्या, बाधित रुग्णसंख्येचा दर तसेच रुग्णालयामध्ये उपचाराधीन रुग्णांकरिता वापरात असलेल्या विविध प्रकारच्या खाटांची संख्या याबाबत दक्ष रहावे. कोणत्याही परिस्थितीत रुग्णसंख्येचा कल यावरुन साथ रोगाचा पुनश्च प्रादुर्भाव होण्याची स्थिती निर्माण होत असल्याचे दिसून आल्यास त्याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास तात्काळ कळविण्यात येईल. जेणेकरुन साथ रोगाचा पुनश्च प्रादुर्भाव सुरुवातीच्या टप्प्यातच रोखण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना सुरु करण्यात येतील.