तेव्हाही भाजपाच्या पाठिंब्याचं सरकार होतं, आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे; राष्ट्रवादीचे ट्विट

0

दि.३: सध्या काश्मीरमध्ये (Kashmir) १९९० पेक्षाही भयानक परस्थिती असल्याचं पंडितांकडून सांगितलं जात आहे. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) भाजपावर (BJP) टीका केली आहे. तेव्हाही भाजपाच्या पाठिंब्याचं सरकार होतं, आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे असे ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपावर टीका केली आहे. काश्मीरमध्ये पुन्हा एकदा अशांतता निर्माण होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. दहशतवाद्यांकडून होणाऱ्या हत्यासत्राच्या भितीने काश्मीरमधून मोठ्या प्रमाणावर हिंदू पंडितांचं स्थलांतर होऊ लागलं आहे. अनेक हिंदू पंडित जम्मूमध्ये येऊ लागले आहेत. परिस्थिती १९९०पेक्षाही भयानक असल्याचं या पंडितांकडून सांगितलं जात आहे. या पार्श्वभूमीवर ‘द कश्मीर फाईल्स’ या चित्रपटासंदर्भात निर्माण झालेला काश्मिरी पंडितांचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेचा विषय बनलेला असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसनं या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून भाजपाला काही सवाल देखील करण्यात आले आहेत.

पुन्हा एकदा पंडितांचे —-

राष्ट्रवादी काँग्रेसनं केलेल्या ट्वीटमध्ये भाजपाचं केंद्रात सरकार असतानाच काश्मीर खोऱ्यात अशांतता निर्माण होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला आहे. “काश्मीर खोऱ्यातून पुन्हा एकदा हिंदू बाहेर पडतोय. ‘द कश्मीर फाईल्स’ची पुनरावृत्ती होतेय. तेव्हाही भाजपाच्या पाठिंब्याचं सरकार होतं. आजही केंद्रात भाजपाचं सरकार आहे”, असं या ट्वीटमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून म्हटलं आहे.

यापूर्वी आणि आताही भाजपाचं सरकार असताना हे प्रकार होत असल्याचं नमूद करतानाच राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘द कश्मीर फाईल्स’ चित्रपटातील अभिनेते आणि या मुद्द्यावरून सातत्याने भूमिका मांडणारे अनुपम खेर यांच्यावर देखील निशाणा साधला आहे. “फरक फक्त एवढाच आहे, की अनुपम खेर तेव्हा कलम ३७० काढून टाका म्हणून ओरड करत होते. आज कलम ३७० काढून टाकले आहे. तरीही काश्मीरमधील हिंदूंची तीच अवस्था आहे”, असं या ट्वीटमध्ये म्हटलं आहे.

“आज ते शांत का?”
कश्मीर फाईल्स चित्रपटाचे निर्माते, कलाकार आणि समर्थक आज शांत का? असा प्रश्न देखील ट्वीटमध्ये विचारण्यात आला आहे. “कश्मीर फाईल्स टॅक्स फ्री करा म्हणून महाराष्ट्र विधिमंडळाचा अमूल्य वेळ खर्च करणारे महाराष्ट्रातील भाजपा नेते देखील शांत का?” असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here