नगरपंचायत निवडणूक निकाल: महाराष्ट्रातील नगरपंचायत निवडणूक, राष्ट्रवादी काँग्रेस अव्वल तर सर्वाधिक नगरसेवक भाजपाचे

0

मुंबई,दि.२०: Maharashtra Nagar Panchayat Election Results: राज्यातील विविध जिल्ह्यांमधील १०६ नगरपंचायतींपैकी ९७ नगरपंचायतींचे निकाल हाती आले आहेत. (नगरपंचायत निवडणूक निकाल) अन्य ९ नगरपंचायतीचे निकाल आज ( गुरुवारी ) घोषित होणार आहेत. एकूण निकालामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने २५ नगरपंचायती जिंकत ३८७ जागांवर विजय मिळवला आहे. भाजपने २४ नगरपंचायती मिळवत ४१६ जागांवर विजय मिळवला आहे. काँग्रेसने १८ नगरपंचायतीसह २९७ जागा जिंकल्या आहेत. तर शिवसेनेने १४ नगरपंचायती जिंकत ३०० जागा मिळवल्या आहेत. अपक्षांनी २६२ जागा मिळवत १६ नगरपंचायती जिंकल्या आहेत. (Maharashtra Nagar Panchayat Election Results)

या निकालांमध्ये (नगरपंचायत निवडणूक निकाल २०२२) महाविकास आघाडीची सरशी झाली असली, तरी भाजपने एकहाती जोरदार घौडदौड केली आहे. शिर्डीतील ४ आणि कळवणमधील २ विनविरोध जागा झाल्या. त्याचबरोबर माळशिरस आणि देवळा येथेही प्रत्येकी एक जागा बिनविरोध झाली. दरम्यान, या निवडणुकीत आम्हीच नंबर वन ठरलो आहोत, असा दावा भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे. राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर झाले आहेत. सर्वत्र जल्लोष सुरू आहे. प्रत्येक पक्षाचे नेते , पदाधिकारी आपापल्या विजयी उमेदवारांचे अभिनंदन करत आहेत.

राज्यातील नगरपालिका, नगरपंचायती तसेच भंडारा व गोंदिया जिल्हा परिषदांच्या निवडणुकांत भाजपने सर्वाधिक जागा मिळविल्या असून, पुन्हा एकदा ‘भाजपच नंबर वन’ असल्याचे सिद्ध झाले आहे, असे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी सांगितले. मुंबईत भाजप प्रदेश कार्यालयात ते बोलत होते. भारतीय जनता पक्षाला पहिल्या क्रमांकाचा पक्ष ठरविल्याबद्दल चंद्रकांत पाटील यांनी मतदारांचे आभार मानले. पक्षाच्या गावोगावच्या नेते, कार्यकर्त्यांचे अभिनंदनही केले. भाजपला या निवडणुकीत ४०० पेक्षा जास्त जागा मिळाल्या आहेत. स्वबळावर किंवा काही मदत घेऊन ३४ नगरपालिका, नगरपंचायतींमध्ये भाजपची सत्ता असेल. गोंदिया जिल्हा परिषदेत भाजपची सत्ता असेल, तर भंडारा जिल्हा परिषदेत मदत घेऊन भाजप सत्तेवर येईल, असे पाटील म्हणाले.

गेली २६ महिने भाजप राज्यात सत्तेबाहेर आहे, तरीही पक्षाचे संघटन मजबूत आहे. भाजपचे नेते आणि कार्यकत्यांची एकजूट आहे. त्यामुळे पक्षाला निवडणुकीत यश मिळाले आहे, असेही ते म्हणाले. राज्यात नोव्हेंबर २०१९ मध्ये महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आले होते. त्यानंतर ग्रामपंचायतींच्या निवडणुका, जिल्हा परिषदांच्या पोटनिवडणुका किंवा पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीत जनतेने भाजपला कौल दिला होता. तसाच कौल नगरपालिका, नगरपंचायतींच्या निवडणुकीतही दिला आहे, असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील नगरपंचायत निवडणुकांचे निकाल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या बाजूने लागले असून, हे निकाल पाहता राष्ट्रवादी काँग्रेस राज्यातील नंबर एकचा पक्ष ठरला आहे, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी सांगितले. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मतदान केल्याबद्दल राज्यातील सर्व मतदारांचे पाटील यांनी आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसने राष्ट्रवादी परिवार संवाद दौरा करुन तळागाळातील कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधला होता, त्यांचे म्हणणे ऐकून घेतले होते. पक्षाच्या बांधणीसाठी विविध उपक्रमे, आंदोलने, कार्यक्रम घेतले. जनता दरबार उपक्रमातून जनतेची कामेही तत्परतेने करण्याचा प्रयत्न केला होता. त्याचाही फायदा या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला झाला आहे, असे ते म्हणाले. या निकालांच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत बोलणाऱ्यांना चांगलीच चपराक लागली आहे , असे सांगतानाच पक्षासाठी सदैव काम करणाऱ्या पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहोचवणाऱ्या कार्यकर्त्यांचा हा विजय आहे, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here