जालना,दि.26: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले होते मात्र ते अंतरवाली सराटीत परत आले आहेत. त्यांनी मराठा समाजाला शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन केले. जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले. जरांगे पाटील हे फडणवीस यांच्या सागर बंगल्यासमोर उपोषण करण्यासाठी निघाले होते. भांबेरी गावातून ते परत अंतरवाली सराटीत आले आहेत.
मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यात मध्यरात्री 1 वाजल्यापासून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार संचारबदी लागू करण्यात आली आहे. मनोज जरांगे यांच्या दोन सहकाऱ्यांना पोलिसांनी रात्रीच ताब्यात घेतले आहे. याचा विरोध म्हणून घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी येथे बस जाळण्यात आली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी रात्री भांबेरी गावात तळ ठोकला होता. त्यानंतर भांबेरी गावात पोलिसांचा मोठा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा अंतरवाली सराटीमध्ये जाण्याचा निर्णय घेतला.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2024/02/1db8f721-c8de-4782-9f4d-77034082813e-2-1-1024x576.png)
”उपमुख्यमंत्र्याच्या सांगण्यावरून अंबड तालुक्यात संचारबंदी लावण्यात आली आहे. सर्वांनी शांत राहावे पोलिसांना त्रास देऊ नये. अंतरवाली सराटीत बैठक घेऊन पुढील दिशा ठरवू,” अशी भूमिका घेत जरांगे पाटील पुन्हा अंतरवालीत पोहोचले आहेत. यावेळी, आज पुन्हा एकदा जरांगे यांनी फडणवीसांवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच, मराठा समाज बांधवांना शांत राहण्याचं आणि घरी जाण्याचं आवाहनही केलं आहे.
राज्यभरातील मराठा बांधवांनी शांत राहाव, अंतरावालीत बैठक घेऊन आपण पुढील दिशा ठरवू, असेही त्यांनी म्हटले. मुंबईकडे जाण्याच्या निर्णयावरही ते पुढील काही तासांत आपली भूमिका जाहीर करणार आहेत.
महाराष्ट्रातील मराठ्यांनी शांततेत आंदोलन करावे, पोलिसांना त्रास देऊ नाये, सगेसोयऱ्यांची अंमलबजावणी घेतल्याशिवाय त्यांना सुट्टी नाही, असे म्हणत जरांगे यांनी फडणवीसांना लक्ष्य केलं. आज मी जिंकलो, फडणवीस हरले. सगसोयरेसह आरक्षण घेतल्याशिवाय फडणवीसांना सुट्टी नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला आहे.
घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले
“महिलांना खरचटलं जरी असतं तर हे राज्य पेटलं असतं. देवेंद्र फडणवीस 100 टक्के महिलांवार हात उचलायला लावणार होते. पण मी आंदोलन चालवत आहे उगाच यशस्वी झालेलो नाही. तुझे डाव ओळखून आहे. आतापर्यंत घरात बसून मराठ्यांच्या जीवावर मोठे झाले,” असेही मनोज जरांगे पाटील म्हणाले.