नवी दिल्ली,दि.15: Maharashtra Politics: महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे. सर्वोच्च न्यायालयात राज्याच्या सत्तासंघर्षावर सुनावणी सुरु असून हे प्रकरण पाच न्यायाधीशांच्या घटनापीठाकडे राहणार की सात न्यायाधीशांच्या घटनापीठासमोर याची सुनावणी होणार हे उद्या निश्चित होण्याची शक्यता आहे. राज्यातील सत्तासंघर्षावर काल (मंगळवारी 14 फेब्रुवारी ) सर्वोच्च न्यायालयात पाच सदस्यीय घटनापीठापुढे सुनावणी पार पडली.
यावेळी ठाकरे गटाच्यावतीने कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. तसेच त्यांनी नबाम रेबिया प्रकरणावरही महत्वाचं भाष्य केलं. याबरोबरच सत्तासंघर्षाची सुनावणी सात सदस्यीय घटनापीठापुढे घेण्यात यावी, अशी मागणीही ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली. दरम्यान, आज पुन्हा याप्रकरणी सुनावणी सुरू झाली. आज शिंदे गटाकडून त्यांची बाजू मांडण्यात आली आहे. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष असेल. उद्या पुन्हा सुनावणी होणार आहे.
हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी | Maharashtra Politics
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना अपात्रतेचा निर्णय घेऊ शकतात की नाही, या मुद्द्यावर हे प्रकरण सात न्यायमूर्तींच्या घटापीठाकडे देण्याची ठाकरे गटाची मागणी आहे. तर पुन्हा पाच न्यायाधीशांचं खंडपीठ नबाम रेबिया खटल्यावर पुनर्विचार करु शकतं का यावर निर्णय होणार आहे.
नबाम रेबिया केसमध्ये पाच न्यायमूर्तीच्या पीठानं…
विधानसभा अध्यक्षांविरोधात अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असेल तर त्यांना कारवाईचा अधिकार आहे की नाही हा या सगळ्या प्रकरणातला कळीचा मुद्दा आहे. 2016 ला अरुणाचल प्रदेशातल्या नबाम रेबिया केसमध्ये पाच न्यायमूर्तीच्या पीठानं महत्वाचा निकाल दिला होता. अविश्वास प्रस्ताव प्रलंबित असताना विधानसभा अध्यक्षांना कारवाईचा अधिकार नाही असं हा निकाल सांगतो. शिंदे गटाकडून याच निकालाचा आधार घेत उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांना अपात्रतेबाबत कारवाईचा अधिकार नाही असं सांगितलं जातंय.