सोलापूर,दि.११: उत्तर प्रदेशच्या लखीमपूर घटनेविरोधात आज राज्य सरकारने महाराष्ट्र बंदची हाक दिली आहे. या बंदवरुन भाजपवर टीका होत आहे. दुसरीकडे काही व्यापारी या बंदला पाठिंबा देत आहेत. तर काही व्यापाऱ्यांनी बंदला विरोध केला आहे. या बंदवर सर्वसामान्य नागरिक आणि व्यापाऱ्यांकडून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. लखीमपूर खेरी येथे घडलेल्या या घटनेच्या निषेधार्थ महाराष्ट्र बंद हाक देण्यात आली आहे. महाविकास आघाडी म्हणजेच शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस राज्यभरात हा बंद पुकारला आहे.
बंदच्या पार्श्वभूमीवर सर्व कार्यकर्त्यांना शांततेत बंद करावा असं आवाहन करण्यात आले आहेत. महाराष्ट्र बंदमध्ये रुग्णालये, रुग्णवाहिका, आरोग्य सेवेशी संबंधित आस्थापना आणि त्यांची वाहतूक, सरकारी कार्यालये, स्वच्छता यंत्रणांना बंदमधून वगळण्यात आले आहे. उर्वरित सर्व दुकाने, व्यापार, कारखाने, खासगी कार्यालये, हाॅटेल्स, ऑटो-टॅक्सी सेवा आदी बंद करण्याचा इशारा आहे. सार्वजनिक वाहतूक सेवा बंदमध्ये सामील असणार नाही.
सोलापूर येथे महाराष्ट्र बंदला प्रतिसाद नाही. शहर व जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था सुद्धा सुरळीतपणे सुरू आहे. त्याचसोबत सर्व व्यवहार नेहमीप्रमाणे सुरु ठेवण्यात आले आहेत. बाजार समितीत मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळत आहे.