मुंबई,दि.27: Loudspeaker Dispute: महाराष्ट्रात भोंग्यावरुन वाद सुरु असताना अॅड. प्रकाश आंबेडकरांनी (Prakash Ambedkar) शांती मार्च काढण्याचा निर्णय घेतला आहे. भोंगा वादावरुन (Loudspeaker Dispute) अॅड. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी शंका व्यक्त केली आहे. भोंग्यावरुन राज्य सरकारने नुकतीच सर्वपक्षीय बैठक घेतली होती. मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची औरंगाबाद येथे 1 मे रोजी सभा होणार आहे. राज ठाकरे यांनी 3 मे पर्यंत मशीदीवरील भोंगे काढण्यात यावे अशी भूमिका घेतली आहे. मात्र, राज ठाकरेंच्या औरंगाबाद दौऱ्यापूर्वीच औरंगाबाद पोलिसांनी शहरात जमावबंदी आदेश लागू केले आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची सभा होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज ठाकरेंच्या सभेची चर्चा सुरु असताना, वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी 1 मे रोजी शांती मार्च काढणार असल्याचे जाहीर केले आहे. मनसे, भाजपा आणि राज्य सरकारची भूमिका पाहता, 3 मेला राज्यात काहीही घडू शकतं, अशी शंका त्यांनी व्यक्त केली. त्यामुळे आम्ही शांती मार्च काढणार असल्याचं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलं. तसेच या मार्चमध्ये कोणत्याही राजकीय पक्षाला थारा नसून विविध संघटनेचं स्वागत केलं जाईल, अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली.
राज ठाकरेंच्या शिवतीर्थ या निवासस्थानी मनसेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीनंतर औरंगाबादमध्ये राज ठाकरेंची सभा शंभर टक्के होणार असल्याची माहिती मनसेचे नेते नितीन सरदेसाई यांनी दिली. आमच्या सभेची पूर्वतयारी उत्तम प्रकारे सुरु आहे. औरंगाबादसह मराठवाड्यामध्ये राज ठाकरेंच्या सभेची उत्सुकता दिसून येत आहे. पोलिसांनी अजूनही सभेला परवानगी दिलेली नाही. मात्र येत्या 1-2 दिवसांत पोलिसांची परवानगी मिळेल, असं नितीन सरदेसाई यांनी सांगितलं.