छत्रपती संभाजीनगर,दि.३: Martyr Aurangzeb: आमचं हिंदुत्व शेंडी जानव्याचे नाही ते राष्ट्रीयत्व आहे. काश्मीरातील सैनिक औंरगजेब जो देशासाठी लढला तो औरंगजेब त्याला अतिरेक्यांनी मारला तो देशासाठी शहीद झाला तो आपला अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजीनगरच्या सभेत औरंगजेबाचं कौतुक केले. महाविकास आघाडीच्या सभेत ते बोलत होते. परंतु भारतीय इतिहासात औरंगजेबाचं असं चरित्र आहे ज्यावरून अनेक वाद आहेत. मात्र उद्धव ठाकरेंनी कौतुक केलेला औरंगजेब कोण हे जाणून घेऊया.
रमजानच्या काळात शस्त्रसंधी लागू होण्याच्या एक दिवस आधी लष्करातील जवान औरंगजेबचे दहशतवाद्यांनी अपहरण करून हत्या केली होती. औरंगजेबच्या हौतात्म्यावर सर्वांनी त्याला सलाम केला, संपूर्ण देश त्याच्या कुटुंबासोबत उभा राहिला.
ईद साजरी करण्यासाठी जात होता औरंगजेब | Martyr Aurangzeb
१४ जून २०१८ रोजी संध्याकाळी पुलवामाच्या कालम्पोरा इथं एक मृतदेह सापडला. कालम्पोरापासून १० किमी अंतरावर जम्मू काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या पथकाला गोळ्यांनी छिन्न केलेला मृतदेह सापडला. डोक्यावर, शरीरावर अनेक गंभीर जखमा होत्या. हा मृतदेह ४४ राष्ट्रीय रायफल्सचा जवान औरंगजेबचा असल्याची पुष्टी झाली. १४ जूनच्या सकाळी रायफल मॅन औरंगजेब ईद साजरी करण्यासाठी राजौरी येथील त्याच्या गावाला जात होता. परंतु दहशतवाद्यांनी त्याचे मध्येच अपहरण केले. त्यानंतर तिरंग्यातून त्याचा मृतदेहच घरी आला.
हिज्बुल कमांडर समीर टायगरचा खेळ खल्लास केला
औरंगजेबाची हत्या करण्याआधी दहशतवाद्यांनी त्याचा क्रूर छळ केला. औरंगजेबाचं नाव भारतीय सैन्याच्या त्या शूर जवानांमध्ये घेतले जाते. हिज्बुल मुजाहिदीनचा दहशतवादी समीर टायगरला ३० एप्रिल २०१८ रोजी चकमकीत ठार केले होते. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीचं नेतृत्व मेजर रोहित शर्मा करत होते. त्यांच्या टीममध्ये औरंगजेब होता. काश्मीर खोऱ्यातील अनेक दहशतवादी कारवायांमध्ये औरंगजेबनं सहभाग घेतला आहे. औरंगजेब हा भारतीय लष्करात जम्मू काश्मीरच्या इंफ्रेंट्रीचा भाग होता. तो ४४ राष्ट्रीय रायफल्ससोबत काम करायचा.
हिटलिस्टवर होता औरंगजेब
औरंगजेब आरआरच्या कोअर कमिटीचा सदस्य होता. २०१७ नंतर काश्मीरात अनेक ऑपरेशन्स झाले. त्यात २६० हून अधिक दहशतवादी मारले गेले. एकट्या दक्षिण काश्मीरात ३० दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. जैश ए मोहम्मदचा मौलाना मसूद अजहरचा भाचा महमूद भाईला आर्मीने यमसदनी धाडले. त्या टीममध्ये औरंगजेब होता. समीर टायगर विरोधात कारवाईतही त्याने महत्त्वाची भूमिका निभावली. त्यामुळे औरंगजेब दहशतवाद्यांच्या हिटलिस्टवर होता. मे २०१९ रोजी पुलवामा चकमकीत औरंगजेबाची हत्या करणाऱ्या शौकत अहमद डारसह ३ जवानांना मारून भारतीय लष्कराने औरंगजेबाच्या हत्येचा बदला घेतला.