Jayant Patil Solapur: शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले…

0

सोलापूर,दि.1: Jayant Patil Solapur: शिंदे गटातील पक्ष प्रवेशावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. गेल्या काही दिवसांपासून शिंदे गटात मोठ्याप्रमाणात पक्षप्रवेश होत आहेत. गृहपक्षांना राजीनामा देऊन मोठ्याप्रमाणात कार्यकर्ते आणि पदाधिकारी शिंदे गटात सामील होत आहेत. यावरून पत्रकारांनी आज जयंत पाटलांना (Jayant Patil) प्रश्न विचारला. त्यावर त्यांनी अत्यंत मिश्किल टिप्पणी दिली. आज सोलापूर दौऱ्यावर असताना पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

काय म्हणाले जयंत पाटील? | Jayant Patil Solapur

“शिंदे गटात गेलेले काही लोक आताच मला भेटले. त्यांनी आताच अर्धातासापूर्वी आमच्या पक्षात प्रवेश केला आहे. शिंदे गटात गेलेले आहेत ते तात्पुरते गेले आहेत. शिंदेंची सत्ता आहे, शिंदे मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत सोयी सवलती मिळत असल्याने लोक तिथे जात आहेत. त्यामुळे तिथे गेलेल्या लोकांसाठी आम्ही काही बोलत नाही. एका कार्यकर्त्याने सांगितलं की सहा महिने जातो, निधी आणतो आणि परत येतो. महत्त्वाच्या कार्यकर्त्याने अशी परवानगी मागितली. नगरपालिकेत निधी येणं गरजेचं आहे. मी जाऊन या म्हटलं”, असं म्हणत जयंत पाटील मिश्किल हसले.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी भाजपमध्ये गेले असल्याने पक्षातील निष्ठावंत अशा भाजप सहकाऱ्यांना कुठे बसवायचे हा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे”, असा खोचक टोलाही त्यांनी यावेळी लगावला. “भाजपचा अंतर्गत प्रश्न असला तरी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधून भाजपमध्ये गेलेले आणि आता शिंदे गटातील लोक नव्याने कधी भाजपवासी होतील हे सांगता येणार नाही. या सर्वांच्या ओझ्याखाली निष्ठावंत कार्यकर्ते मागे ढकलले गेले आहेत. भारतीय जनता पक्षात ती अस्वस्थता मोठी आहे”, असे मत त्यांनी व्यक्त केले.

नाव देण्याचं समर्थनच केलं पाहिजे

“अहमदनगरला अहिल्याबाई होळकर यांचं नाव देण्याचं समर्थनच केलं पाहिजे. याला विरोध करणं आम्ही योग्य समजत नाही. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचं वास्तव्य होतं. आम्ही संपूर्ण गावाच्या सुधारणांसह निधी द्यायचं काम सुरू केलं होतं. ते गाव विकसित झालं आहे. चौंडीला अहिल्यादेवी होळकरांचं स्थान असल्याने त्या जिल्ह्याला महत्त्व आहे”, असंही जयंत पाटील म्हणाले.

“दिल्लीतील ज्या मुलींनी जगात मेडल्स मिळवले, जागतिक दर्जाच्या खेळांमध्ये प्राविण्य मिळवले. त्यांना रस्त्यावर पाडणं, त्यांच्या तोंडावर पाय ठेवलं, याप्रकरणी संपूर्ण देश निषेध करतेय. एका बाजूला तुम्ही संसदेचं उद्घाटन करताय तर दुसऱ्या बाजूला तुम्ही खेळाडूंचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करताय का तर त्या दिवशी संपूर्ण मीडियामध्ये संसदेच्या उद्घाटनाचं सुरू आहे. त्यामुळे या आंदोलकांना तिथून हटवलं तर मीडिया त्यांना कव्हर करणार नाही. मोठा इव्हेंट सुरू असताना धरणे धरणाऱ्यांना हाकलून देण्याचं काम करण्यात आलं. खेळाडू आणि संपूर्ण देश त्यांच्यामागे उभा राहिला. भाजपानेच त्या कार्यक्रमाला गालबोट लावून घेतलं”, असंही जयंत पाटील म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here