मुंबई,दि.18: इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी काशी आणि मथुरेतील वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचा आमचा कुठलाही मानस नाही असे म्हटले आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांचे नाते जनसंघापासून आहे. या संबंधामुळे अनेकदा भाजपवर टीकाही झाली आहे. तरीही राजकीय वर्तुळात याची चर्चा होत असते.
तसेच याआधी अनेकदा भाजपने आरएसएसची मदत घेतली आहे. तसेच त्यांच्या विचारसणीलाही पाठिंबा दिला आहे. भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संबंध आणि आरएसएसने भाजपला केलेली मदत हे राजकारणात दिसून आले आहे. आता याबाबत भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केलेल्या विधानाने पुन्हा एकदा याबाबत चर्चा होत आहे.
आमचा पक्ष आम्हीच चालवतो
आता भाजप सक्षम आहे. त्यामुळे आमचा पक्ष आम्हीच चालवतो, असे नड्डा म्हणाले. आधी आम्ही पुरेसे सक्षम नव्हतो, त्यामुळे आम्हाला आरएसएसची गरज लागत होती. मात्र, आता आम्ही सक्षम असल्याने आमचे निर्णय आम्हीच घेतो आणि पक्षही चालवतो, असे नड्डा यांनी सांगितले. इंडियन एक्सप्रेस वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे विधान केले आहे. अटल बिहारी वाजपेयींच्या काळातील भाजप आणि सध्याच्या भाजप यातील फरक काय? असा प्रश्न नड्डांना विचारण्यात आला होता. त्यावर त्यांनी हे विधान केले.
नड्डा यांना भाजपला आता आरएसएसच्या पाठिंब्याची गरज नाही का? असे विचारल्यावर म्हणाले की, आता आमचा पक्ष वाढला आहे. प्रत्येकाला आपापली कर्तव्ये आणि भूमिका आहेत. आरएसएस ही एक सांस्कृतिक आणि सामाजिक संघटना आहे आणि आम्ही एक राजकीय संघटना आहोत. त्यामुळे आमच्या भूमिका वेगळ्या आहेत. तसेच आता गरजेचा प्रश्न नाही. त्यांची वैचारिक आघाडी आहे. ते त्यांची भूमिका पार पाडत आहेत. आम्ही आमची राजकीय भूमिका पार पडत आहोत. आम्ही आमचे राजकीय बळ आमच्या पद्धतीने वाढवत आहोत. आम्ही आमच्या पद्धतीने काम करत आहोत. आम्ही आमचे राजकीय व्यवहार आमच्या परीने हाताळत आहोत. हेच राजकीय पक्षांनी केले पाहिजे, असेही नड्डा म्हणाले.
वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचा…
काशी आणि मथुरेतील वादग्रस्त ठिकाणी मंदिर उभारण्याचा आमचा कुठलाही मानस नाही, असे नड्डा म्हणाले. महिला, दलित, गरिब आणि तरुणांचा विकास यावर आमच्या पक्षाचा भर आहे. योगी आदित्यनाथ आणि हिमंता बिस्वा शर्मांसारखे नेते वेळोवेळी काशी, मथुरेचा उल्लेख करतात, याबाबत विचारले असता ते म्हणाले की, राम मंदिर प्रत्यक्षात उभारण्यात आल्याने काही नेते भावूक होतात किंवा भावनेच्या भरात बोलून जातात, अशी सारवासरवही त्यांनी केली.