उष्माघाताचा महाराष्ट्रात पहिला बळी, उष्माघातामुळे शेतकऱ्याचा मृत्यू

0

जळगाव,दि.30: महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. राज्यात अनेक शहरात तापमानात वाढ होत आहे. पुढील चार दिवसात राज्यातील विविध भागात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे. या काळात मराठवाड्यासह विदर्भातील काही शहरांचे तापमान 43 ते 44 अंशापर्यंत वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दुपारच्या वेळी घराबाहेर पडण्याचं टाळावं. तसेच दिवसभरात जास्तीत जास्त पाणी प्यावं असा सल्ला हवामान विभागाच्या तज्ज्ञांकडून देण्यात आला आहे.

अनेक शहरात उष्णतेची लाट येणार असा इशारा देण्यात आला आहे. अशातच जळगावमध्ये उष्माघाताचा (heatstroke) पहिला बळी ठरला आहे. शेतात काम करून घरी परतत असताना उन्हाचा फटका बसल्यामुळे एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. अमळनेर तालुक्यातील मांडळ इथं ही घटना समोर आली आहे. 33 वर्षीय जितेंद्र संजय माळी असं उष्माघाताने मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. जितेंद्र माळी दुपारपर्यंत रस्त्यावर खमंग विकले आणि त्यानंतर शेतात कामाला गेले होते. शेतातून काम करून येत असताना उन्हाचा फटका बसला आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला.

या प्रकरणी अमळनेर तालुक्यातील मारवड पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. उष्माघात सदृश्य लक्षणे असल्याने जितेंद्र माळी यांचा मृत्यू झाला असं स्थानिक डॉक्टरांचे म्हणणं आहे. तर मेंदूतून रक्तस्त्राव झाल्याची अमळनेर ग्रामीण रुग्णालयाचे डॉक्टर आशिष पाटील यांनी माहिती दिली. दरम्यान, माळी यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर योग्य तो खुलासा होईल.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here