औरंगाबाद,दि.२६: औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याबद्द्ल वक्तव्य केले. औरंगाबाद शहरामध्ये आज एकता आगळ्यावेगळ्या उपक्रमाला सुरुवात झाली. एमजीएम कॅम्पस येथील रुक्मिणी भवन सभागृहामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच् अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते पुस्तक वाटप कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. शिक्षक आमदार विक्रम काळे यांच्या स्थानिक आमदार विकास निधीतून विभागातील आठ जिल्ह्यातील ३३०० शाळांना दहा कोटी ३१ लाख २५ हजार रुपये किंमतीची ११ लाख ७१ हजार ५०० पुस्तके ग्रंथालयांसाठी भेट देण्याची मोहीम राष्ट्रवादीच्या या दोन नेत्यांच्या हस्ते सुरु करण्यात आली. या कार्यक्रमाला हजर राहिलेल्या शरद पवार यांनी केलेल्या भाषणामध्ये राज्याचे अर्थमंत्री म्हणजेच अजित पवार यांच्याबद्दल केलेलं एक वक्तव्य ऐकून उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. विशेष म्हणजे पवारांनी हे वक्तव्य केलं तेव्हा अजित पवार मंचावरच होते.
शिक्षक प्रतिनिधी आमदाराचं गणित कच्चं
“विक्रम काळेंनी मला फोन करुन सांगितलं की आम्हाला १५ मिनिटं द्या. आम्हाला जी पुस्तकं वाटायची आहेत त्या कार्यक्रमाची सुरुवात करुन फक्त जा. मी घड्याळ बघतोय. विक्रम काळे हे शिक्षकांचे प्रतिनिधीचं गणित इतकं कच्चं असेल याचं उदाहरण आता पाहायला मिळालं. १५ मिनिटं झाली आणि आपण जवळपास एक तासावर आलाय,” असं म्हणत पवारांनी भाषणाला सुरुवात करताच सभागृहामध्ये हशा पिकला.
निधीचा चांगला वापर…
“वेगवेगळ्या क्षेत्रातील विचारवंताची पुस्तकं आहेत. यातून वाचन संस्कृती वाढवी हे डोक्यात ठेऊन विधीमंडळाच्या सदस्याचा जो काही निधी असतो. त्याचा योग्य वापर करण्याचा आदर्श कार्यक्रम विक्रम काळेंनी हाती घेतला आणि त्याची आता सुरुवात होतेय/ खासदाराला जे काही मिळतं आणि आमदाराची तुलना केली तर महाराष्ट्रातील लोकप्रितिनिधांना लोकांसाठी काम करता यावं म्हणून अर्थमंत्र्यांकडून एवढी मोठी रक्कम राज्यातील लोकप्रितिनिधींना दिली जाते,” असं पवार म्हणाले.
अजित पवारांना झोप लागणार नाही…
आपलं भाषण संपवताना शरद पवार यांनी त्यांचे पुतणे आणि राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडे करण्यात आलेल्या मागण्यांवरुन मजेशीर भाष्य केलं. “मी अर्थमंत्र्यांचं भाषण ऐकत होतो. नंतर विक्रम काळेंचं भाषण ऐकलं. त्यांनी आधी सांगितलं की काही नाही फक्त १५ मिनिटांचा कार्यक्रम आहे फक्त पुस्तकं वाटून जायचं. पण त्यांच्या भाषणामध्ये त्यांनी इतक्या मागण्या केल्यात की माझी खात्री आहे, की अर्थमंत्र्यांची झोप आज काही चांगली लागणार नाही,” असं शरद पवार म्हणाले. पवारांनी हे वक्तव्य केल्यानंतर सभागृहामधील उपस्थितांमध्ये एकच हसू पिकले.