मुंबई,दि.१०: आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश शेटे (Dr. Omprakash Shete) यांनी सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये अशी तंबी हॅास्पिटलला दिली आहे. नुकतेच पैशाअभावी दीनानाथ हॉस्पिटलमध्ये एका महिलेचा उपचाराअभावी मृत्यू झाला होता. डॅा. ओमप्रकाश शेटे यांनी राज्यातील सर्व खासगी, शासकीय रुग्णालयांना पत्र पाठवले आहे. देशामध्ये महाराष्ट्र हे सर्व क्षेत्रात आघाडीवर असणारे राज्य आहे. कला, संस्कृती, इ. विविध क्षेत्रात प्राविण्य-प्रामाणिकता या सूत्रावर आधारित महाराष्ट्र राज्याचे नावलौकीक आहे, असे डॅा. शेटे यांनी म्हटले आहे.
परंतु काळाच्या ओघा बरोबर कधीकाळी वैद्यकीय क्षेत्र प्रामाणिकपणे सेवा करण्याकरिता अग्रणी स्थानी असताना दुर्दैवाने वैद्यकीय क्षेत्र औद्योगिक क्षेत्राकडे म्हणजेच पैसा कमवणे, अर्थकारण करणे व तेही सामाजिक तत्त्वांचे उल्लंघन करत उपचारावरील अमाप खर्च वसूल करणे असेच झाले आहे. परंतु रुग्ण सेवा करत असताना याचा सुवर्णमध्य काढता आला पाहिजे. रुग्ण आणि रुग्णालय दोन्हीही जिवंत राहून कार्य करता आले पाहिजे. प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अर्थात आयुष्मान भारत मिशन व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना या एकत्रित योजनेद्वारे महाराष्ट्रातील साडेबारा कोटी लोकांना लाभ देण्याकरिता माननीय पंतप्रधान व मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या सक्तीने सूचना असून “सामान्य माणूस पैशाअभावी किंवा उपचारा अभावी मरता कामा नये”. असे डॅा. ओमप्रकाश यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार | Dr. Omprakash Shete
आयुष्मान योजनेअंतर्गत अंगीकृत असलेल्या रुग्णालयांनी गंभीर असलेला रुग्ण दाखल करून घेत असताना संबंधित रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांकडून अर्ज लिहून घेतला जातो की, “मला ह्या योजनेचा लाभ घ्यायचा नाही”, मुळात आणीबाणीच्या परिस्थितीमध्ये रुग्ण किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत संबंधित रुग्णालयांमध्ये योजनेची सुविधा असतांना देखील वैद्यकीय क्षेत्राला काळीमा फासण्याचा गैरप्रकार सुरू आहे.
माझी रुग्णालय प्रशासनास नम्र विनंती आहे की, “स्व. बाळासाहेब ठाकरे अपघात विमा योजना” ही योजना” ही देखील राज्य आरोग्य हमी सोसायटी अर्थात आयुष्मान योनजेद्वारे नियंत्रित केली जाते. अपघात झालेल्या रुग्णास पैसे न घेता तात्काळ उपचार करण्याची जबाबदारी रुग्णालयांवरती आहे. या योजनेअंतर्गत आधार कार्ड/शिधापत्रिका नंतर दाखल केली तरी जिओ टॅगिंगचा अपघात ग्रस्त रुग्णांचा एक फोटो व नंतर एफ.आय.आर. पाठविल्यानंतर योजनेअंतर्गत निधी पाठवला जातो. यामुळे कोणतेही आवश्यक कागदपत्र उपलब्ध नसताना अपघातग्रस्त रुग्णांवर तात्काळ उपचार करून रुग्णाचे प्राण वाचवणे हे प्राधान्य ठरते. असे शेटे यांनी म्हटले आहे.