सातारा,दि.4 : उपमुख्यमंत्री अजित पवार हे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भारतीय जनता पार्टीवर सडकून टीका केली आहे. ‘त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय माहीत? पण इतर पक्षात गेला की चौकशी सुरू होते, अशी जळजळीत टीका राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर केली. वाई शहरामध्ये आज विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि कोविड योध्याचा सन्मान सोहळा होता. या वेळी बोलत असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजपवर सडकून टीका केली. ‘त्यांच्या पक्षात माणूस गेला की तो धुतल्या तांदळा सारखा स्वच्छ होतो. त्याच्यावर गोमूत्र शिंपडून त्याला अंघोळ घालतात की काय माहीत? त्यांचा पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात असला की त्याची चौकशी लागते. बऱ्याच जणांची चौकशी लागलेली आहे, ते तिकडे गेले आणि काहींना आमदार की मिळाली काहींना मंत्रिपद मिळालं. त्यांच्यावर लागलेल्या चौकशी सुद्धा बंद झाली. हे चाललेलं राजकारण न समजण्या इतकी जनता दूधखुळी नाहीये, सूज्ञ आहे त्यांना या सगळ्या गोष्टी कळतात, असा टोला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी लगावला. ‘मी कधीच चुकीचं करा असं सांगणार नाही. मी कधी चुकीचं समर्थन करणार नाही. पण काही जण कारण नसताना लोकांची बदनामी करत असतात. लोकांना खोटं सांगितलं जात, सारखं खोटं सांगत राहिला की लोकांनी खरं वाटायला लागतं, असा दुर्दैवी प्रकार राज्याच्या राजकारणात सुरू आहे’, असं म्हणत अजित पवारांनी भाजपवर टीका केली