Deepali Sayed: दीपाली सय्यद यांच्यावर खळबळजनक आरोप, कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप

Deepali Sayed: दीपाली सय्यद यांनी अनेकांना बोगस लग्नांच्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप

0

मुंबई,दि.७: अभिनेत्री दीपाली सय्यद (Deepali Sayed) यांच्यावर खळबळजनक आरोप करण्यात आला आहे. दीपाली सय्यद यांच्यावर त्यांच्याच माजी सहकाऱ्याने गंभीर आरोप केलेत. दीपाली सय्यद शिवसेनेत असताना आपल्या आक्रमक विधानामुळे चर्चेत असायच्या. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर दीपाली सय्यद यांनी शिवसेनेची (ठाकरे गट) साथ सोडली. दीपाली सय्यद गेल्या काही दिवसांपासून त्यांच्या राजकीय भूमिकांमुळे चर्चेत आल्या होत्या.

दीपाली सय्यद यांच्यावर गंभीर आरोप

मात्र आता एका वेगळ्याच कारणामुळे त्यांची चर्चा होत आहे. दीपाली यांच्यावर त्यांच्याच माजी स्वीय सहाय्यकाने गंभीर आरोप केले आहेत. सांगली याठिकाणी पत्रकारांशी बोलताना दीपाली यांचे माजी स्वीय सहाय्यक भाऊसाहेब शिंदे (Bhausaheb Shinde) यांनी अभिनेत्रीवर गंभीर आरोप केले. दीपाली सय्यद यांनी अनेकांना बोगस लग्नांच्या माध्यमातून कोट्यवधींचा गंडा घातल्याचा आरोप शिंदेंनी केला आहे.

दीपाली सय्यद यांच्यावर भाऊसाहेब शिंदेंचे खळबळजनक आरोप

भाऊसाहेबांचा असा आरोप आहे की दीपाली सय्यद यांनी लग्न झालेल्या जोडप्यांचे पुन्हा एकदा लग्न लावून सामुदायिक विवाह सोहळा दाखवला आणि कोट्यवधी रुपये लाटले. त्यांनी असे म्हटले की, ‘दीपाली भोसले सय्यद चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून त्यांनी हजारो कोटींचे वाटप केले. ऑडिट रिपोर्ट जेव्हा माझ्या हातात आले तेव्हा या चॅरिटेबल ट्रस्टच्या खात्यात ९१८२ रुपये आढळले. त्यामुळे बाकीची रक्कम दीपाली यांनी कोठून आणली आणि कोठून दिली याची चौकशी गुन्हे आर्थिक शाखेने करावी’.

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन

दीपाली सय्यद यांचे पाकिस्तान आणि दुबई कनेक्शन असल्याचाही भाऊसाहेब यांचा आरोप आहे. याशिवाय राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांचे साटेलोटे असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. त्यांनी पुढे अशी प्रतिक्रिया दिली की, ‘मी राज्याच्या मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांना विनंती करतोय की आठ दिवसात जर या चॅरिटेबल ट्रस्टची चौकशी झाली नाही तर मी उपमुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी आत्मदहन करेन.

भगतसिंह कोश्यारी यांचाही सहभाग?

दरम्यान भाऊसाहेबांचे आरोप केवळ दीपाली सय्यद यांच्यावर नाहीत तर त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनाही लक्ष्य केले. त्यांनी कोणत्या तारखेला हा लग्नसोहळा पार पडला हे देखील नमुद केले. भाऊसाहेब सांगतात की, ‘९ सप्टेंबर २०२१ रोजी राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि दीपाली सय्यद यांनी बोगस लग्न लावली.’ त्यांनी २०१६ लग्न झालेल्या एका दाम्पत्याचं त्यांनी उदाहरण दिलं. भाऊसाहेबांनी दिलेल्या प्रतिक्रियेनुसार या दाम्पत्याला २०१८ मध्ये मुलही झालं, तरी कोश्यारी आणि सय्यद यांनी पुन्हा चॅरिटेबल ट्रस्टअंतर्गत त्यांचे लग्न लावले.

दीपाली सय्यद यांची चौकशी व्हावी अशी मागणी भाऊसाहेबांनी केली आहे. दरम्यान याप्रकरणी अभिनेत्री दीपाली सय्यद यांनी एका वाहिनीशी बोलताना हे सर्व आरोप फेटाळले आहेत.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here