गांधीनगर,दि.24: 27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपच्या विजयाला काँग्रेसच जबाबदार अशी टीका ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमीन (एआयएमआयएम) अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. गुजरात निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. गुजरात निवडणुकीत भाजपा, काँग्रेस आणि आम आदमी पक्षाचा जोरदार प्रचार सुरू आहे.
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असदुद्दीन ओवेसी यांनी भाजपा आणि काँग्रेस यांच्यावर एकत्र निशाणा साधला. गुजरातमधील निवडणूक सभेत बोलताना, “अनेक दशकांपासून राज्यात भाजपची सत्ता आहे आणि त्याला काँग्रेसच जबाबदार आहे”, असा घणाघात ओवेसींनी केला.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/11/IMG-20221118-WA0011-46.jpg)
27 वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपच्या विजयाला काँग्रेसच जबाबदार
“27 वर्षांपासून नरेंद्र मोदी गुजरातमध्ये काँग्रेसला चहा पाजून-पाजून पराभूत करत आहेत आणि चहा मध्ये चहा खूप कमी असतो, जास्त असते ते दूध आणि मलई. त्यामुळे २७ वर्षांपासून गुजरातमध्ये भाजपच्या विजयाला काँग्रेसच जबाबदार आहे. आमच्या इथे येण्याने भाजपला फायदा होईल किंवा भाजपाचा विजय होईल, असे बोलले जाते. काँग्रेसचे लोकही तसाच आरोप करतील यात वाद नाही. पण मी सांगतो आमच्यामुळे इतरांच्या मतांमध्ये नक्कीच कपात होईल. कारण मी तुम्ही विभागायला आलेलो नाही तर एकत्र करायला आलो आहे, एकजूट करायला आलो आहे, गरिबांचा हक्क मागायला आणि त्यांना मिळवून द्यायला आलो आहे,” असे रोखठोक मत असदुद्दीन ओवेसी यांनी मांडले.
काँग्रेसवर निशाणा
काँग्रेसवर निशाणा साधत AIMIM प्रमुख ओवेसी म्हणाले, “182 जागांपैकी आम्ही 13 जागांसाठी लढलो तर 169 जागा उरल्या आहेत. तुम्ही सर्व जिंकलात तरी तुम्हाला कोण रोखत आहे, पण तुम्ही जिंकू शकणार नाही, कारण सत्य बोलणे, पंतप्रधानांच्या चुका सांगणे, त्यांच्या 15 लाखांच्या आश्वासनाला खोटे बोलणे, हे किती प्रक्षोभक भाषण समजले जाते आहे. ते साऱ्यांनाच जमेल असे नाही. काँग्रेसचे लोक भाजपाविरोधात का बोलताना दिसत नाहीत. तुमची पण जीभ आहे, पण ती त्यांच्याविरोधात चालत नाही. असे का घडते? तुम्ही मोदींशी तडजोड केली आहे का?” असा सवालही ओवेसींनी उपस्थित केला.