मुंबई,दि.१: एकनाथ शिंदे गटाचे (Eknath Shinde Group) आमदार गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी मोठं विधान केलं होतं. बाळासाहेब ठाकरे यांचे सेवक चम्पासिंग थापा यांच्यानंतर आता उद्धव ठाकरेंचे स्वीय्य सहाय्यक मिलिंद नार्वेकरदेखील शिंद गटात सहभागी होतील असा दावा गुलाबराव पाटील यांनी केला आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.
शिवसेना आणि एकनाथ शिंदे गट दोन्ही बाजूंनी अनेक दावे-प्रतिदावे केले जात आहेत. यादरम्यान, शिंदे गट आणि शिवसेनेत मोठ्या प्रमाणात पक्षप्रवेशदेखील होत असून, आपली बाजू भक्कम आहे असं दाखवण्याचा प्रयत्न होत आहे. त्यातच आता शिंदे गटातील आमदार गुलाबराव पाटील यांच्या विधानामुळे मिलिंद नार्वेकर शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा रंगली आहे. त्यावर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही भाष्य केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते आज ५जी सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यानिमित्ताने त्यांनी पनवेल येथील ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले मनपा शाळेत उपस्थित राहून विद्यार्थ्यांशी संवाद साधला. कार्यक्रमानंतर एकनाथ शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत ५जी मुळे मोठी क्रांती होईल असा विश्वास व्यक्त केला. या कार्यक्रमासाठी पनवेलमधील शाळा निवडली असल्याचा अभिमान असल्याचंही ते म्हणाले. देशाच्या अर्थव्यवस्थेत महाराष्ट्राचा मोठा वाटा आहे. महानगरपालिका, नगरपालिका तसंच जिल्हा परिषदेच्या शाळा डिजिटल करायच्या असून ५ जी सेवेचा मोठा फायदा होईल असंही ते म्हणाले.
एकनाथ शिंदेंना यावेळी राजकीय प्रश्न विचारले असता त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं. मात्र मिलिंद नार्वेकर यांच्याबद्दल वारंवार विचारण्यात आलं असता त्यांनी आपल्या याबाबत काहीच माहिती नसल्याचं स्पष्ट सांगितलं. एक दिवस तरी राजकीय विषय सोडा असंही ते मिश्कीलपणे प्रसारमाध्यमांना म्हणाले. यावेळी त्यांनी कंगना राऊत भेटीवरही भाष्य केलं.
कंगना आपली भेट घेणार आहे असं सांगण्यात आलं असता ते म्हणाले “मुख्यमंत्री या नात्याने मला अनेकजण भेटत असतात. पण अद्याप तरी त्यांच्या भेटीची माहिती नाही. मी काही लपवून ठेवत नाही. आपला सगळा कारभार पारदर्शक आहे. पोटात एक, ओठात एक असं नसतं”.