चिंचवड,दि.१०: Chandrakant Patil: शाईफेक घटनेनंतर चंद्रकांत पाटलांनी आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. भाजपा नेते मंत्री चंद्रकांत पाटील यांनी फुले, आंबेडकर आणि कर्मवीर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. चंद्रकांत पाटील यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि महात्मा फुले यांनी देणगी मागून म्हणजेच भीक मागून शाळा चालवल्याचे वादग्रस्त विधान केले होते. भाजपमधील नेत्यांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वारंवार वादग्रस्त विधाने केली जात आहेत. असे असताना त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. याचा राग मनात धरून काही कार्यकर्त्यांनी चिंचवड येथे चंद्रकांत पाटील यांच्या अंगावर शाई फेकली. यानंतर चंद्रकांत पाटील यांनी संताप व्यक्त केला. मी कुणालाही घाबरत नाही. हिंमत असेल तर समोरुन या, पोलीस बाजूला करतो, अशी आक्रमक प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी या घटनेनंतर नोंदवली.
चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक
भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवडमध्ये शाईफेक करण्यात आली आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांच्यावर हा हल्ला झाला. या प्रकरणी हल्लेखोरांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. वादग्रस्त वक्तव्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी दिलगिरीही व्यक्त केली होती.
पिंपरी-चिंचवडमध्ये चंद्रकांत पाटील मोरया गोसावी महोत्सवासाठी आले होते. या कार्यक्रमाला जायच्या आधी ते कार्यकर्त्याच्या घरी थांबले होते. कार्यकर्त्याच्या घरातून निघताना चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली.
काय म्हणाले चंद्रकांत पाटील?
पुण्याचे पालकमंत्री असलेले चंद्रकांत पाटील चिंचवडमधील मोरया गोसावी संजीवन समाधी महोत्सवाच्या कार्यक्रमासाठी आले होते. तेथे हा प्रकार घडला. यावर, मी कार्यक्रमाला चाललो आहे. मी सर्व कार्यक्रम करणार आहे. मी कुणाला घाबरत नाही. असा भ्याडपणे हल्ला करणे चुकीचे आहे. हिंमत असेल तर समोरुन या. सर्व पोलिस डिपार्टमेंट बाजूला करतो, असे आव्हान चंद्रकांत पाटील यांनी दिले. चंद्रकांत पाटील यांच्यावर समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी शाईफेक केल्याचे समोर आले आहे.
‘आम्ही आमच्या कार्यकर्त्यांना खुली सूट दिली असती तर केवढ्याला पडलं असतं. ही आमची संस्कृती नाही. शब्दांना शब्दांनी टक्कर देता येते’, अशी प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली.
गिरणी कामगाराचा मुलगा इथपर्यंत येणं सरंजामशाहीवाल्यांना झेपत नाहीये, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. तसंच कोणत्याही पोलिसावर कारवाई करू नका, असं आवाहन चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केलं.