नवी दिल्ली,दि.10: Suresh Gopi: केरळमधील त्रिशूरमधून भाजपचे नवनिर्वाचित खासदार सुरेश गोपी (Suresh Gopi) यांनी मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर ते आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची बातमी समोर आली आहे. आता त्यांनीच अशा बातम्यांचे खंडन केले आहे.
केरळमधील ते एकमेव भाजप खासदार आहेत ज्यांना मोदी मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले आहे. काल मंत्रिपदाची शपथ घेणाऱ्या 72 खासदारांमध्ये त्यांचाही समावेश होता.
काय म्हणाले सुरेश गोपी? | Suresh Gopi
सुरेश गोपी यांनी त्यांच्या एका पोस्टमध्ये म्हटले आहे की, “काही मीडिया प्लॅटफॉर्म चुकीच्या बातम्या पसरवत आहेत की मी मोदी सरकारच्या मंत्रिपरिषदेचा राजीनामा देणार आहे. हे पूर्णपणे चुकीचे आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत आहोत. केरळच्या विकासासाठी आणि समृद्धीसाठी वचनबद्ध आहे.”
सुरेश गोपींच्या कार्यालयाने काय सांगितले?
मीडिया रिपोर्ट्सनंतर, सूत्राने सुरेश गोपी यांच्या कार्यालयाचा हवाला देऊन सांगितले की, ते पद सोडू इच्छित असल्याचा दावा करणाऱ्या वृत्तांवर स्पष्टीकरण जारी करतील.
सुरेश गोपी यांच्या कार्यालयाने यापूर्वीच सांगितले होते की त्यांनी मंत्रीपदाचा राजीनामा देण्याबाबत कधीही बोलले नाही. मीडियाच्या एका विशिष्ट वर्गाकडून गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांच्या कार्यालयाने म्हटले होते. खातेवाटपानंतर सुरेश गोपी स्पष्टीकरण जारी करतील.