सोलापूर,दि.22: Bijju Pradhane: भाजपचा राजीनामा देऊन राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या बिज्जू प्रधानेंसह पाच जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोलापूर (Solapur) शहर भारतीय जनता (BJP) पार्टीचे सरचिटणीस बिज्जू प्रधाने (Bijju Pradhane) यांनी (18 फेब्रुवारी) राजीनामा दिला होता. रविवारी (20 फेब्रुवारी) बिज्जू प्रधाने यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. बैठकीत त्यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करणार असल्याचे सांगितले.
बिज्जू प्रधाने हे भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख यांचे कट्टर समर्थक होते. मात्र भाजपात त्यांच्यावर वारंवार अन्याय होत आहे अशी त्यांची व कार्यकर्त्यांची मानसिकता झाली होती.आमदार विजयकुमार देशमुख यांच्या विजयात बिज्जू प्रधाने यांचा महत्वाचा वाटा होता. 2012 मध्ये आणि 2017 मध्ये पक्षाने बिज्जू प्रधाने यांना उमेदवारी (महापालिकेची) दिली होती. मात्र पक्षातील काही लोकांमुळे त्यांचा पराभव झाला होता. आमदार विजयकुमार देशमुख पाठबळ देण्याऐवजी त्यांचे खच्चीकरण करत आहेत अशी त्यांची धारणा झाली.
सोमवारी बिज्जू प्रधाने यांनी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत आपल्या समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. प्रवेशाचा कार्यक्रम रात्री उशिरा बारा वाजता झाला. मात्र एवढ्या उशिरा रात्री कार्यक्रम होऊनही बिज्जू प्रधाने यांच्या समर्थकांनी प्रचंड गर्दी केली होती. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यक्रमाला एवढा उशीर होऊनही एवढी गर्दी होती, रात्री एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी जमते ती एका महत्वाच्या व्यक्तिमत्वासाठी जमते, ती व्यक्ती म्हणजे बिज्जू प्रधाने असे गौरवोद्गार काढले.

बिज्जू अण्णा ज्या भारतीय जनता पक्षात काम करत होते, तिथे कार्यकर्त्यांना गरजेपुरते वापरून बाजूला सारण्याची प्रथाच आहे. कार्यकर्त्यांकडून काम करून घेणे आणि गरज संपली की कार्यकर्त्याला सोडून देणे ही प्रथा राष्ट्रवादीत नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सर्वांनाच योग्य वागणूक मिळते, असे जयंत पाटील यांनी यावेळी नमूद केले.
राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला विनापरवाना गर्दी जमवत कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी बिज्जु प्रधाने यांच्यासह पाच जणांवर फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सोमवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास बाळे येथे आपण राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये प्रवेश करणार असून यासाठी प्रधाने व इतर चार असे एकूण पाच जणांनी याने पोलीस प्रशासनाकडे परवानगी मागितली होती. पोलीस प्रशासनाने फक्त 50 जणांच्या उपस्थितीसाठी परवानगी दिली होती. पण सोमवारी सायंकाळी मात्र बाळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी जमविल्याप्रकरणी बिज्जु प्रधाने, सुभाष डांगे, मारुती तोडकर, नागनाथ क्षीरसागर, मदन क्षीरसागर यांच्यावर नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहे.