सातारा,दि.३: कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनी राज्य शासनाच्या वाईन विक्रीला विरोध केला आहे. राज्य सरकारने वाईन विक्रीला सुपर मार्केटमध्ये परवानगी दिल्यानंतर राज्यातील अनेकांनी याला विरोध केला आहे. विरोधी पक्ष असलेल्या भाजपसह काही सामाजिक कार्यकर्त्यांनीही या निर्णयावरून सरकारवर टीकेची झोड उठवली. कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांनीही साताऱ्यात ‘दंडवत दंडुका’ या आंदोलनाद्वारे सरकारच्या वाईन विक्रीबाबतच्या निर्णयाचा विरोध केला आहे. तसंच यावेळी बोलताना त्यांनी राजकीय नेत्यांबाबत वादग्रस्त विधान केलं आहे.
‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला, अशी मराठीत म्हण आहे. उद्धव ठाकरे यांना अजित पवारांचा गुण लागल्याने सरकारने दारू विक्रीचा निर्णय घेतला,’ असं बंडातात्या कराडकर यांनी म्हटलं आहे. सरकारची मनमानी सुरू असून सरकारला लवकरच हा निर्णय बदलावा लागेल, असंही ते म्हणाले.
राजकीय नेत्यांची मुलं दारू पितात
वाईन विक्रीच्या निर्णयाला विरोध करताना बंडातात्या कराडकर यांनी राज्यातील विविध नेत्यांवर गंभीर आरोप केले. ‘पंकजा मुंडे आणि सुप्रिया सुळे यांच्यासह सर्वच राजकीय नेत्यांची मुले दारू पितात,’ असा दावा करत कराडकर यांनी खळबळ उडवून दिली.
दरम्यान, बंडातात्या कराडकर यांच्या आक्रमक वक्तव्यांनी आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. याबाबत राजकीय नेत्यांकडून काय स्पष्टीकरण दिलं जातं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.