शेतकऱ्यांसाठी कृषिपंप वीजबिलांची थकबाकीमुक्ती योजना

0

सोलापूर जिल्ह्यात १ लाख ८६ हजार शेतकऱ्यांनी घेतला लाभ

सोलापूर,दि.२१: कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त होण्यासाठी थकबाकीच्या रकमेत सुमारे ६६ टक्के सूट मिळविण्याची संधी राज्य शासनाच्या कृषिपंप वीजजोडणी धोरण २०२० च्या माध्यमातून उपलब्ध आहे. जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ८३८ शेतकऱ्यांनी या योजनेत सहभाग नोंदविला आहे. या ऐतिहासिक योजनेत सहभागी होऊन कृषिपंपाचे वीजबिल कोरे करावेत तसेच चालू वीजबिलांचा नियमित भरणा करावा, असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.

या योजनेत वीजबिलांच्या वसुलीतून एकूण ६६ टक्के कृषी आकस्मिक निधी म्हणजेच प्रत्येकी ३३ टक्के निधी ग्रामपंचायत व जिल्हास्तरावर विकास कामांसाठी खर्च करण्यात येत आहे. हा निधी त्या-त्या ग्रामपंचायत व जिल्ह्याच्या क्षेत्रातच स्थानिक वीजयंत्रणेच्या पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी खर्च करण्यात येत आहे. स्वतंत्र खात्यात जमा होणाऱ्या निधीतून नवीन उपकेंद्र, नवीन रोहीत्र व क्षमतावाढ तसेच नवीन वीजजोडण्या यासह वीज वितरण व उपकेंद्रातील विविध यंत्रणेच्या पायाभूत सक्षमीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे कृषिपंपांसह सर्व वर्गवारीतील ग्राहकांना आणखी दर्जेदार वीजपुरवठा उपलब्ध होणार आहे. कृषिपंपांच्या वीजबिलांतून संपूर्ण थकबाकीमुक्ती व सोबतच भरलेल्या वीजबिलांच्या ६६ टक्के निधीतून गावातील वीजयंत्रणेचा विकास या दुहेरी फायद्यासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन महावितरणने केले आहे.

कृषीपंप वीजजोडणी धोरण २०२० मधून शेतकऱ्यांना कृषिपंपाच्या वीजबिलातून थकबाकीमुक्त करण्यासाठी सुमारे ६६ टक्के सूट मिळणार आहे. मूळ थकबाकीमधील व्याज व दंड माफी तसेच निर्लेखन यानंतरच्या सुधारित थकबाकीची ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास उर्वरित ५० टक्के थकबाकीदेखील माफ करण्यात येत आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १ लाख ८५ हजार ८३८ शेतकऱ्यांनी थकबाकीमुक्त योजनेत सहभाग नोंदविला आहे. यामध्ये त्यांनी थकबाकी व चालू वीजबिलांपोटी १४१ कोटी ८ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांना थकबाकीपोटी भरलेल्या रकमेएवढी सूट, महावितरणकडून निर्लेखनद्वारे मिळालेली सूट तसेच विलंब आकार व व्याजातील सूट अशी एकूण ७५३ कोटी ५२ लाख रुपये माफ झाले आहेत. यामध्ये ९ हजार २५५ शेतकरी वीजबिलांमधून संपूर्णपणे थकबाकीमुक्त झाले आहेत. त्यांनी चालू वीजबिलासह सुधारित थकबाकीच्या ५० टक्के रकमेचे एकूण ३८ कोटी ९१ लाख रुपयांचा भरणा केला आहे. त्यामुळे सुधारित थकबाकीमध्ये त्यांना आणखी २८ कोटी ८ लाख रुपयांची सूट व संपूर्ण थकबाकीमुक्ती मिळाली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील ३ लाख ६८ हजार १३४ शेतकऱ्यांकडे एकूण ५२०४ कोटी रुपयांची एकूण थकबाकी होती. त्यातील व्याज व दंड माफीसोबतच महावितरणच्या निर्लेखन सूटद्वारे आता ३५९९ कोटी २० लाख रुपयांची सुधारित थकबाकी आहे. त्यातील ५० टक्के रक्कम येत्या मार्च २०२२ पर्यंत भरल्यास आणखी १७९९ कोटी ६० लाख रुपयांच्या उर्वरित सुधारित थकबाकीची रक्कम माफ होणार आहे. या ऐतिहासिक थकबाकीमुक्ती योजनेत सहभागी व्हावे तसेच चालू वीजबिलाचा भरणा करून वीजपुरवठा खंडित होण्याची कटू कारवाई टाळावी. वीजबिलांच्या थकबाकीमुक्तीसह आपल्या गावांतील वीज यंत्रणेचा विकास साधावा असे आवाहन महावितरणकडून करण्यात आले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here