अंजली दमानिया यांनी मानले शिंदे, फडणवीस व सुळे यांचे आभार

0

मुंबई,दि.१: सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस आणि सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. अंजली दमानिया यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर फर्नांडीस कुटुंबियांच घर लाटल्याचा आरोप केला होता. पिंडीत कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी दमानिया 20 वर्षापासून लढा देत आहेत.

छगन भुजबळांची सांताक्रुझ पश्चिम येथील इमारत ही फर्नांडिस कुटुंबाच्या जागेवर बांधली असून या कुटुंबाला एकही पैसा भुजबळांनी दिला नाही. गेल्या अनेक वर्षापासून फर्नांडिस कुटुंब त्यांच्या न्यायहक्कासाठी लढतंय, परंतु भुजबळांकडून कुठलीही दाद मिळत नाही. या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी आम्ही प्रयत्न करतोय. ४८ तासांत कुटुंबाला पैसे न मिळाल्यास भुजबळांच्या घरासमोर आंदोलन करू असा इशारा अंजली दमानिया यांनी दिला होता.

अखेर या प्रकरणात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसै देण्यास भाग पाडल्यामुळे या लढ्याला यश आल्याचा खळबळजनक खुलासा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे आता शिंदे-फडणवीसांमुळे फर्नांडिस कुटुंबियांना आता साडे आठ कोटीची रक्कम मिळाली आहे. 

फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळाल्याचं दमानिया यांनी सांगितलं. त्यासाठी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि खासदार सुप्रिया सुळे यांचे आभार मानले आहेत. 

काय म्हणाल्या अंजली दमानिया?

गेले काही वर्ष फर्नांडिस कुटुंबाला न्याय मिळवून देण्यासाठी लढा दिला होता. सांगण्यास आनंद आहे की भुजबळ कुटुंबाने त्यांचे देणे तब्बल २० वर्षाने दिले. त्या कुटुंबाला आता त्यांचे पूर्ण पैसे मिळाले, अशी माहिती अंजली दमानिया यांनी दिली. तसेच, ७८ वर्षाच्या त्या आईला आता तिच्या ३ ऑटिस्टिक मुलांच्या भविष्याची काळजी करावी लागणार नाही, असेही त्यांनी म्हटले.  

पवार कुटुंबाबरोबर माझी टोकाची भूमिका असतांना देखील ह्या लढ्यात राजकारण बाजूला ठेऊन सुप्रिया सुळे यांनी खूप मदत केली. त्याबद्दल त्यांचे मनापासून आभार, असेही दमानिया यांनी म्हटले. तर, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भुजबळांना समज देऊन पैसे देण्यास भाग पाडले, त्याबद्दल दोघांचेही मनापासून आभार, असे ट्विट दमानिया यांनी केले आहे. भुजबळांकडून २० वर्षानंतर फर्नाडिस कुटुंबाला न्याय मिळाला. भ्रष्टाचाराविरुद्ध अनेक लढे दिले. पण या लढ्यातून खूप समाधान मिळाल, असेही त्यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here