केंद्र सरकारने घेतला महत्वाचा निर्णय,ज्येष्ठ नागरिकांनाही सहज मिळणार नोकरी

0

दि.29 : नोकरी करणारे वयाच्या 58 वर्षानंतर निवृत्त होतात. काही जणांना निवृत्तीनंतरही कामाची गरज असते. तर काहींना वेळ जात नाही म्हणून नोकरीची गरज असते. मात्र काही ठिकाणी वयाच्या 58 नंतर काही ठिकाणी 60 नंतर निवृत्त व्हावे लागते. मात्र ज्येष्ठ नागरिकांना नोकरी मिळत नाही. सरकार ज्येष्ठ नागरिकांबाबत मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. सरकार ज्येष्ठ नागरिकांना आधार देण्याचा प्रयत्न करत आहे.

आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिन 1 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो. यंदाच्या ज्येष्ठ नागरिक दिनी भारतातल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी नव्या संधींचं दालन उघडणार आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी एम्प्लॉयमेंट एक्स्चेंज (senior citizen) सुरू करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. या एक्स्चेंजच्या माध्यमातून ज्येष्ठ नागरिकांना नवीन नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले जातील. हे एक्स्चेंज 1 ऑक्टोबरपासूनच सुरू होणार आहे. याशिवाय सरकारने ज्येष्ठ नागरिकांसाठी एक हेल्पलाइनही सुरू केली आहे. ज्येष्ठ नागरिकांना येणाऱ्या समस्यांचं निराकरण या हेल्पलाइनद्वारे केलं जाईल.

ज्येष्ठ नागरिकंना अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांना मदत करण्यासाठी सरकारने ‘एल्डर लाइन’ नावाची देशव्यापी टोल फ्री हेल्पलाइन सुरू केली आहे. 14567 हा हेल्पलाइन नंबर असून, या हेल्पलाइनवर ज्येष्ठ नागरिकांना पेन्शन, कायदेशीर समस्या, भावनिक आधार, छळाच्या विरोधात मदत, बेघर झाल्यास मदत आदी साह्य मिळू शकेल.

60 वर्षांनंतरही काम करणं शक्य असलेल्या आणि नोकरी करण्याची इच्छा असलेल्या ज्येष्ठ नागरिकांसाठी केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालय ‘सीनियर एबल सिटीजन्स फॉर री-एम्प्लॉयमेंट इन डिग्निटी’ नावाचं पोर्टल सुरू करणार आहे देशात प्रथमच अशा प्रकारचं रोजगार केंद्र उघडलं जात आहे. त्यामध्ये स्वतःची नोंदणी करून ज्येष्ठ नागरिक स्वत:साठी रोजगार शोधू शकतील.

हे एक परस्परसंवादी व्यासपीठ असेल. त्यावर भागधारक एकमेकांना प्रत्यक्ष भेटतील आणि रोजगाराच्या संधींबद्दल बोलतील, असं टाइम्स ऑफ इंडियाच्या एका वृत्तात म्हटलं आहे. सामाजिक न्याय मंत्रालयाने सीआयआय (CII), फिक्की (Ficci) आणि असोचेम (Assocham) यांसारख्या उद्योग संघटनांना पत्र लिहून त्यांना ज्येष्ठ नागरिकांना रोजगार उपलब्ध करू देण्यास मदत करण्यास सांगितलं आहे. या पोर्टलवर ज्येष्ठ नागरिकांना त्यांचं शिक्षण, अनुभव, कौशल्य, आवडी इत्यादींची माहिती द्यावी लागेल. हे एक्स्चेंज रोजगाराची हमी देत नसल्याचं मंत्रालयाने स्पष्ट केलं आहे. ज्येष्ठ नागरिकांची पात्रता आणि त्यांची कंपनीला असलेली गरज लक्षात घेऊन त्यांना नोकरी देणं हा सर्वस्वी कंपन्यांचा निर्णय असेल; मात्र यातून संधी शोधण्यासाठी एक व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here