सोलापूर,दि.२४: शिवसेना (शिंदे गट) जिल्हाप्रमुख अमोल शिंदे (Amol Shinde) यांनी भाजपाचे (BJP) सोलापूर जिल्ह्यातील सर्व उमेदवार पाडू असा इशारा दिला आहे. मागील २५ वर्षापासून शहर मध्यची जागा शिवसेनेची असून भाजप ही जागा खोटे बोलून बळकाविण्याचा प्रयत्न करत आहे, असे झाल्यास सोलापूर शहर जिल्ह्यातील भाजपाचे सर्व उमेदवार पाडू असा इशारा अमोल शिंदे यांनी दिला आहे. गुरुवारी, (दि.२४) विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शहर-जिल्हा पदाधिकाऱ्याची बैठक झाली. त्यानंतर शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
काय म्हणाले अमोल शिंदे? | Amol Shinde
सोलापूर शहर मध्य येथे शिवसेनेचे मोठे प्राबल्य असून या ठिकाणी शिवसेनेचे आमदार निवडून आले आहेत त्यामुळे शिवसेनेला हा मतदारसंघ सोडावा, भाजपाने सोलापूर जिल्ह्यातील इतर मतदारसंघात आपले आमदार असताना शहर मध्य कशाला हवा आहे. शहर मध्य येथे भाजपाकडे उमेदवार नसताना देखील त्यांनी उमेदवार आयात करून शिवसेनेवर लादण्याचा प्रयत्न केला आहे, हे कदापि शिवसेना सहन करणार नसून भाजपचे शहर जिल्ह्यातील सर्व उमेदवार पाडू, असा इशारा शिंदे यांनी दिला.
शहर मध्य मधून शिवसेना शहरप्रमुख मनोज शेजवाल, शहर उत्तर मधून जिल्हाप्रमुख अमोल शिंदे, उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सत्तूबर व युवा सेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, अक्कलकोट मधून अभिजीत आप्पासाहेब पाटील तर पंढरपूर-मंगळवेढा मधून तालुकाप्रमुख अशोक चौडे हे संभाव्य उमेदवार असतील व उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी हे उमेदवारी अर्ज भरण्यात येईल असे ते म्हणाले.
या पत्रकार परिषदेस मनोज शेजवाल, उपजिल्हाप्रमुख अन्नप्पा सतूबार, तुकाराम मस्के, युवासेना जिल्हाप्रमुख उमेश गायकवाड, सागर शितोळे राजकुमार शिंदे, नवनाथ चव्हाण, युवा सेना शहरप्रमुख समर्थ मोठे, संजय सरवदे, सुनील निंबाळकर, हरिभाऊ चौगुले, बापू ढगे, शंकर चौगुले, जावेद पटेल, अक्षय बिद्री, ब्रह्मदेव गायकवाड, प्रकाश शिंदे आदी उपस्थित होते.