मुंबई,दि.२९: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्यामुळे ५ जुलैचा मोर्चाबाबत (Ajit Pawar On Mumbai Morcha) संभ्रम निर्माण झाला आहे. ५ जुलै रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईत शाळेतील हिंदी सक्ती विरोधात मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. या मोर्चाला शिवसेना (ठाकरे गट) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनीही पाठिंबा दिला आहे. ठाकरे गटाचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होणार आहेत. (Ajit Pawar On 5 July Mumbai Morcha)
मनसेने मुंबईत आयोजित केलेल्या मोर्चाला राष्ट्रवादीनेही (शरद पवार गट) पाठिंबा दिला आहे. राष्ट्रवादी (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी देखील सर्व कार्यकर्त्यांना मोर्चात सामील होण्याचे आवाहन केले आहे. मोर्चाला राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते आमदार अमोल मिटकरी यांनीही पाठिंबा दर्शवला आहे.

अजित पवार काय म्हणाले? | Ajit Pawar On Mumbai Morcha
मोर्चाला सर्व स्तरातून पाठिंबा मिळत असताना अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे मोर्चाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. मोर्चा निघणार की नाही याबाबत चर्चा सुरू आहे. ‘मोर्चाची वेळच येऊ नये असा आमचा प्रयत्न आहे,’ असं विधान अजित पवार यांनी केले आहे. मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हिंदीसंदर्भातील विषयावर चर्चा होऊन मोठा निर्णय घेतला जाईल असं सूचकपद्धतीने अजित पवारांनी सांगितलं आहे.