“रिक्षामध्ये जर कुणी पुरुष बसला तर त्याचा फोटो काढून…” अजित पवार

0

पुणे,दि.२२: उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोमवारी (दि.२१) महिलांना रिक्षामध्ये जर कुणी पुरुष बसला तर त्याचा फोटो काढून ठेवा असा सल्ला दिला.  ‘पिंक इ रिक्षा’ चावी वाटपाचा कार्यक्रम उपमुख्यमंत्री पवारांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी महिलांना हा सल्ला दिला.

काय म्हणाले अजित पवार?

पवार म्हणाले, महिला आणि मुलींनी रिक्षाने जाताना या पिंक रिक्षाचा विचार करावा. तुम्ही जर पुरुषाला रिक्षामध्ये बसवलं. तर त्याचा फोटो काढायचा आणि तुमच्या घरी पाठवून द्यायचा की, आता मी या ग्राहकाला घेऊन चालले आहे. जर त्या ग्राहकांनी काय गडबड केली तर त्याचा पुरावा आपल्याकडे राहील.

आम्ही सगळे पुरुष गडबड करणारे नाहीत परंतु काही वेगळय़ा विचारांचे लोक असतात. काही लोक विकृत असतात. पुरुषांना सांगायचे भावा तू माझ्याकडे बसला आहेस. तुझी आठवण म्हणून फोटो काढत असून हे गरजेचे आहे. या योजनेतून आम्ही महिलांना समाजाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचे काम आम्ही करत आहोत.  

नरेंद्र मोदी अनेक योजना राबवत आहेत 

आजचा कार्यक्रम महत्वाचा असून राज्याचे सामाजिक परिवर्तन घडवणारा आहे. महिला आणि बालकांसाठी नरेंद्र मोदी अनेक योजना राबवत आहेत. राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली देखील अनेक योजना आम्ही राबवत आहोत. 80 कोटी रुपये पहिल्यांदा मी या कामासाठी मंजूर केले होते. विधानसभा निवडणुकीच्या आधी आम्हाला ही योजना राबवायची होती. चांगल्या कंपनीकडून आम्ही या रिक्षा घ्यायच ठरवले होते.

महिलांना या रिक्षाच्या चाव्या दिल्या आहेत. ही योजना महिलाना ठोस अशा प्रकारचा प्रेरणादायी कार्यक्रम देण्याची आहे. आम्हाला महिलांना सक्षम आणि बळकट करायचे आहे. महिला सबलीकरण करायचे आहे.  

लाडकी बहीण योजना बंद होणार नाही  

राज्यात लाडक्मया बहिणी विधानसभेला आमच्या पाठीशी विश्वासाने उभ्या राहिल्या आहेत. आम्हाला खूप मोठा पाठिंबा मिळाला आहे. आम्ही महिलांच्या पाठीमागे मजबुतीने उभं आहोत. अनेकजण आमच्यावर आरोप करतात की, उद्याच्या काळात आमचे हे सगळे कार्यक्रम बंद पडतील. लाडक्या बहिणीचा निधी देणार नाहीत. 

पण मी आज सगळय़ांना सांगतो की, राज्य सरकारने जी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. तो महिलांच्या सन्मानासाठी कोणत्याही परिस्थितीमध्ये ज्या महिला त्याला लाभामध्ये बसतात त्या महिलांना कधीही हा निधी बंद होऊ देणार नाही. कुणाला काय अफवा उठवायच्या आहेत ते उठवू द्या ही योजना बंद होणार नाही. लोकसभेच्या वेळी देखील अफवा उठवली गेले की, हे संविधान बदलतील पण असे नव्हते, आपल संविधान जगात श्रेष्ठ आहे. अस संविधान आम्ही बदलणार नसल्याचे पवार यांनी सांगितले.