Ajit Pawar: सुधीर मुनगंटीवार यांनी विचारले शिवजयंती ही तारखेनुसार की तिथीनुसार करायची? अजित पवारांनी दिले चोख प्रत्युत्तर

0

मुंबई,दि.२१: Ajit Pawar: शिवजयंती १९ फेब्रुवारीला साजरी करण्यात येते. शिवसेना शिवजयंती ही तिथीप्रमाणे साजरी करत होती. राज्यात आज तिथीनुसार शिवजयंती साजरी होत असतानाच विधानसभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये यावरूनही वाद रंगताना दिसला. शिवजयंती ही तारखेनुसार साजरी करायची की तिथीनुसार हा मुद्दा चर्चेच्या केंद्रस्थानी होता. यावेळी भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) यांनी सरकारला पेचात पकडण्याचा प्रयत्न केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आज मुंबई विमानतळाच्या परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला वंदन केले. तर राज्य सरकारने यापूर्वीच शिवजयंती साजरी केली आहे. त्यामुळे शिवजयंती कधी साजरी करायची, यावर सरकारची भूमिका काय आहे, असा सवाल सुधीर मुनगंटीवार यांनी विचारला.

उपमुख्यमंत्री अजित (Ajit Pawar) पवार यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्या या प्रश्नाला चोख प्रत्युत्तर दिले. त्यांनी म्हटले की, आमचे सरकार येण्यापूर्वी सुधीर मुनगंटीवार यांनी पाच वर्षे अर्थमंत्री म्हणून काम केले. पाच वर्षे मी सभागृहात येत होतो. त्यावेळेस सभागृहात तिथीनुसार शिवजंयती साजरी झाली नाही किंवा कधीही छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो ठेवला गेला नाही, याकडे अजित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. आताही शिवजयंतीवरून वाद होता कामा नये. उद्धव ठाकरे हे आज मुख्यमंत्री म्हणून नव्हे तर शिवसेना पक्षप्रमुख म्हणून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी गेले होते. दिवंगत नेते रामकृष्ण मोरे मंत्री असताना शिवाजी महाराज यांचा जन्म १९ फेब्रुवारी १६३० रोजी झाल्याची नोंद करण्यात आली. तेव्हापासून हीच तारीख प्रमाण मानून या दिवशी शिवजयंती साजरी केली जाते. या दिवशी मुख्यमंत्री शिवनेरीवर जातात. ही प्रथा आजही कायम आहे. राष्ट्रवादी काँग्रेसही तारखेप्रमाणे शिवजयंती साजरी करते. पण तिथीनुसार शिवजयंती साजरी करायची असेल तर तो अधिकार प्रत्येक नेत्याला, आमदाराला आणि खासदाराला आहे. कारण नसताना या मुद्द्यावरून चर्चा होता कामा नये, असे अजित पवार यांनी सांगितले.

मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी तिथीनुसार येणारी शिवजयंती भव्य स्वरुपात साजरी झाली पाहिजे, असे आदेश मनसैनिकांना दिले होते. यावरून शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना विचारणा केली असता त्यांनी मनसेला अप्रत्यक्ष टोला लगावला. कोणी काय करायचं हा आपापल्या बुद्धीचा प्रश्न आहे. शिवाजी महाराजांच्या नावाने ज्यांना राजकारण करायचं असेल त्यांनी ते करावं, असे संजय राऊत यांनी म्हटले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here