संजय राऊत यांनी न्यायालयावर उपस्थित केले प्रश्न, किरीट सोमय्या यांची आणखी प्रकरणे बाहेर येणार असल्याचा राऊत यांचा दावा

0

मुंबई,दि.14: शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी न्यायालयावर प्रश्न उपस्थित केले आहेत. ठराविक पक्षाच्या नेत्यांना न्यायालयाकडून जामीन कसा मिळतो? मात्र महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही असा प्रश्न राऊत यांनी उपस्थित करत न्याय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यावर Save INS Vikrant या मोहीमेखाली पैसे जमा करून 57 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत आयएनएस विक्रांतच्या पैशांचा अपहार झाला आहे, तसेच या प्रकरणी आरोपी निर्दोष नाहीत, त्यामुळे उगाच वचवच करू नये अशा आक्रमक शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी किरीट सोमय्या यांना लक्ष्य केले.

भाजप (BJP) नेते किरीट सोमय्यांना (Kirit Somaiya) हायकोर्टानं मोठा दिलासा दिला असून. मुंबई उच्च न्यायालयानं किरीट सोमय्यांना अटकेपासून संरक्षण दिलं आहे. तसेच, अटक झाल्यास 50 हजारांच्या जामीनावर सुटका करण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, किरीट सोमय्यांनी संयम बाळगावा, आणखी प्रकरणे बाहेर येणार आहेत असे सांगत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधत भाजप नेते किरीट सोमय्यांवर हल्लाबोल केला आहे. आणखी काय म्हणाले राऊत?

महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही?

विशिष्ट पक्षाच्या लोकांनाच अटकेपासून संरक्षण मिळतंय. महाविकास आघाडीच्या नेत्यांना जामीन का मिळत नाही? असा सवाल राऊतांनी केला आहे. तसेच न्यायव्यवस्थेत विशिष्ट विचारसरणीचे लोक आहेत असे सांगत राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत.

देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जातोय अशी भीती

देशाच्या न्यायव्यवस्थेची स्थिती गंभीर झाली आहे, देश पुन्हा फाळणीच्या दिशेनं जातोय अशी भीती वाटतेय. आज बाबासाहेब आंबेडकर असते तर अश्रू ढाळले असते असे यावेळी सोमय्या म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here