हा भाजपाचा भोंगा आहे, ईडीची कारवाईतून भाजपाने सुट दिल्यानंतर हा भोंगा सुरू झाला आहे: संजय राऊत

0

मुंबई,दि.१३: मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर शिवसेना नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्यावर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी ठाणे येथे काल (दि.१२) जाहीर सभेत बोलताना पुन्हा एकदा मशिदींवरील लाऊड स्पीकरचा मुद्दा काढला. राज ठाकरेंनी राज्य सरकारला भोंग्यावरून इशारा दिला आहे. मशिदींवरील भोंग्यांचा त्रास संपूर्ण देशाला होत आहे. येत्या ३ मे रोजी ईद आहे. या तारखेपर्यंत सरकारने मौलवींशी चर्चा करून भोंगे उतरवावेत, अन्यथा मशिदींसमोर हनुमान चालिसा लावूच, असा निर्वाणीचा इशारा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी राज्य सरकारला दिला आहे. दरम्यान अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती असं प्रत्युत्तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना दिलं आहे.

“बाळासाहेब ठाकरेंनी मशिदीवरील भोंग्यासंबंधी भूमिका मांडली होती. पण हा भाजपाचा भोंगा आहे. ईडीची कारवाई झाली त्याबद्दल भाजपाने सूट दिली असून त्यानंतर हा भोंगा सुरु झाला आहे. दीड वर्ष हा भोंगा बंद होता,” अशी टीका संजय राऊत यांनी केली.

“हिंदुत्व आम्हाला शिकवण्याची गरज नाही, ते आमच्या रक्तात आहे. जेव्हा हिंदुत्वावर हल्ला झाला आहे तेव्हा भाजपा आणि त्यांचे भोंगे समोर नव्हते. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे, शिवसेना हिंदुत्वासाठी लढली आहे. कालची गोष्ट सोडून द्या, रात गई बात गई…दिवा विझताना मोठा होतो आणि तसंच झालं आहे,” असा टोला संजय राऊतांनी लगावला.

“काही गोष्टींकडे राजकारणात दुर्लक्ष केलं पाहिजे. हा भाजपाचा भोंगा असल्याचं सर्वांना माहिती आहे. जे महाविकास आघाडीसोबत थेट लढू शकत नाहीत ते असे भोंगे लावून माहौल तयार करत आहेत. अशा लोकांना आमच्याविरोधात बोलण्यास लावलं जात असून राजकीय पोळ्या भाजत असतात,” अशी टीका संजय राऊतांनी केली.

“अल्टिमेटम राज्य सरकारला कोणी देत नाही. अल्टिमेटम देण्याची हिंमत या देशात आणि महाराष्ट्रात फक्त बाळासाहेब ठाकरेंमध्ये होती. बाळासाहेबांनी दहशतवाद्यांना अल्टिमेटम दिला होता. अमरनाथ, वैष्णेदेवी यात्रा असो किंवा दहशतवादी कारवाया…अल्टिमेटम देण्याची ताकद आणि कुवत राजकारणात, देशात फक्त बाळासाहेबांमध्ये होती,” असं यावेळी संजय राऊत म्हणाले.

“ईडीच्या कारवाईबाबत केंद्राकडून अभय मिळाल्याने हा भोंगा वाजू लागला आहे. खोट्या कारवायंविरोधात आम्ही लढत आहोत, आम्हाला चिंता नाही. आमच्या नकला करा, खोटं बोला पण शिवसेना, महाविकास आघाडी भक्कम आहे,” असं राऊत म्हणाले,. तसंच एका वैफल्यातून, निराशेतून असे भोंगे वाजत आहेत असंही ते म्हणाले. भाजपाने आमच्याविरोघात भोंगे वाजवले त्याचा फायदा झाला नाही म्हणून नवीन भोंगे लावलेत असा टोला यावेळी त्यांनी लगावला.

दरम्यान राज ठाकरेंनी शिवराळ भाषेवरुन केलेल्या टीकेवर बोलताना ते म्हणाले की, “होय…बरोबर आहे. पण ज्यासंदर्भात मी शिवराळ भाषा वापरली त्या शिवराळ भाषेचं कौतुक करायला हवं होतं कारण कालपर्यंत मराठी अभिमानी म्हणून ते मिरवत होते. महाराष्ट्राच्या अस्मितेचे, मराठी माणसाच्या स्वाभिमानाचे आम्हीच तारणहार आहोत, शिवसेना नाही अशा प्रकारची भूमिका घेऊन ते राजकारणात आले आहेत. त्यामुळे त्यांनी जर माझ्या शिवराळ भाषेचं कौतुक केलं असतं किंवा शिवसेनेला पाठिंबा दिला असता तर त्यांचं मराठीप्रेम दिसलं असतं”.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here