मुंबई,दि.२: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची आज २ एप्रिल रोजी गुढीपाडव्यानिमित्त (Gudi Padwa) शिवाजी पार्कमध्ये जाहीर सभा झाली. या सभेत राज ठाकरे यांनी महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. राज ठाकरेंनी अजित पवारांची नक्कल करत “मी महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री…” असं म्हणत केली टीका. “एकदा सकाळी उठतो काय, पहातो काय, जोडा वेगळाच, सालं पळून कोणाबरोबर गेली, लग्न कोणा बरोबर केलं हेच समजेना,” असा टोला राज ठाकरेंनी लगावला.
विधानसभेचा निकाल लागल्यानंतर उद्धव ठाकरेंना साक्षात्कार
निकाल लागल्यानंतर खास करून उद्धव ठाकरे यांना साक्षात्कार झाला. अडीच अडीच वर्षे ठरली होती, महाराष्ट्रात सभा झाल्या तेव्हा कधी बोलले नाहीत, इथे मुंबईत मोदी यांची सभा झाली तेव्हा व्यासपीठावर होतात तेव्हा बोलला नाहीत, मोदी – शहा हे दोन्ही बोलले मुख्यमंत्री फडणवीस होतील तेव्हा बोलले नाहीत. जेव्हा निकाल लागला तेव्हा सरकार आपल्यामुळे अडचणीत येऊ शकतं, मग काढलं… अडीच वर्षाचे काय झाले?, असा सवाल राज ठाकरेंनी केला.
गेली दोन वर्ष करोनामुळे सर्व विस्मृतीत गेलंय. त्यामुळे करोनापूर्वी जे घडलं ते पण आपण विसरतो, तेच यांच्या फायद्याचं ठरतं, असं म्हणत राज ठाकरेंनी सत्ताधारी आणि विरोधकांवर टीका केली.
तुम्ही यांचे गुलाम आहात का?
यांच्यासाठी मतदान करता, यांचे गुलाम आहात का, यांनी कोणतीही खेळी करावी आणि तुम्ही ते बघत राहावं, कारण तुम्ही सगळ्या गोष्टी विसरता, असं राज ठाकरे जनतेला म्हणाले.
१०० कोटी वसुली
“मुंबईच्या पोलीस आयुक्ताला हटवलं जातं, आयुक्त गृहमंत्र्यांवर १०० कोटी वसुलीचे आरोप केले, गृहमंत्री जेलमध्ये जातो. पण तुम्ही सगळं विसरता, याचाच फायदा ते घेत आलेत,” असं राज ठाकरे म्हणाले.
जिलेटीन
“अंबानींच्या घराबाहेर जिलेटीन ठेवणारा वझे जो एकेकाळी शिवसेनेत होता. हे सहज होतं का?, देशातल्या सर्वात मोठ्या उद्योगपतीच्या घराबाहेर जिलेटीन भरलेली गाडी ठेवणं इतकं सोपंय का,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार – राज ठाकरे
आपण जर जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलो असतील, तर कोणतं हिंदू आणि हिंदुत्व घेऊन बसता. राज्यातील जातीपातीच्या राजकारणाला शरद पवार जबाबदार असल्याचा आरोप राज ठाकरेंनी केला.
इतिहास विसरला की
“जो माणूस इतिहास विसरला ना, त्याच्या पायाखालचा भूगोल सटकला, असा इशारा राज ठाकरेंनी दिला. आमचे गृहमंत्री आणि मंत्री जेलमध्ये जातात, पण सरकार सत्तेत आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबलेल्या नाहीत. हे सगळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्र राज्यात होतंय,” अशी टीका राज ठाकरेंनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं
१९९९ ला जेव्हा राष्ट्रवादीचा जन्म झाला, त्यानंतर जातीपातीचं राजकारण वाढलं. त्यापूर्वी जात ही अभिमान होती. मात्र राष्ट्रवादीच्या जन्मानंतर यांनी दुसऱ्या जातीचा द्वेष करायला शिकवलं. आम्ही जातीतून बाहेर पडणार नाही, तर मग आम्ही हिंदू कधी होणार, असं राज ठाकरे म्हणाले. “जातीपातीच्या राजकारणात अडकून पडलेलो आपण हिंदू म्हणून कधी एकत्र येणार,” असा सवाल राज ठाकरेंनी केला.
बाबासाहेब पुरंदरे
“बाबासाहेब पुरंदरेंनी इतिहास लिहीला म्हणून त्यांना जातीवरून सॉफ्ट टार्गेट केलं गेलं. ते काही म्हणाले की ते ब्राम्हण आहेत, असं म्हणत त्यांच्यावर टीका व्हायची,” असं राज ठाकरे म्हणाले.
झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका
“माझी पंतप्रधानांना विनंती आहे की झोपडपट्ट्यांमध्ये असलेल्या मदरशांवर धाडी टाका. पोलिसांना देखील माहिती आहे. तुम्हाला पाकिस्तानची गरज नाही, या झोपडपट्टीत इतक्या गोष्टी हाती लागतील,” असं राज ठाकरे म्हणाले.
जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का?
“प्रार्थनेला विरोध नाही, पण मशिदीवरील भोंगे खाली उतरावेच लागतील. सरकारला हा निर्णय घ्यावा लागेल. नाहीतर ज्या मशिदीबाहेर हे भोंगे लागतील, त्याच्या समोर दुप्पट स्पीकर लावून हनुमान चालिसा लावायची. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे, कोणत्याही धर्मात लाऊडस्पीकरचा नियम नाही. जेव्हा धर्म बनला तेव्हा लाऊडस्पीकर होता का, सर्वांनी आपला धर्म घरात ठेवावा,” असं राज ठाकरे म्हणाले.