मुंबई, दि.२०: Sanjay Raut On The Kashmir Files: विवेक अग्निहोत्रीचा (vivek agnihotri) चित्रपट ‘द कश्मीर फाइल्स’ (the kashmir files) सध्या देशभरात चर्चेचा विषय ठरत आहे. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवनवीन विक्रम करताना दिसत आहे. काश्मीरमधील पंडितांवर १९९० साली झालेल्या अत्याचारांसंदर्भातील कथानकावर हा चित्रपट आधारित आहे. तर दुसरीकडे या चित्रपटावरुन राजकारणही चांगलेच तापले आहे.
भाजपाकडून (bjp) या सिनेमाचा प्रचार करण्यात येत आहे तर काँग्रेसनं या सिनेमावरून भाजपावर निशाणा साधला आहे. या सिनेमातून गेल्या अनेक दशकांपासून जे सत्य लपवण्याचा प्रयत्न झाला ते समोर आलं आहे. ‘द काश्मीर फाइल्स’ सारखे सिनेमे यायला हवेत असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (Prime Minister Narendra Modi) म्हटलं होतं. मात्र या सिनेमावर शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी टीका केली आहे.
शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले की, कश्मीर हा आपल्या देशासाठी आणि देशाच्या जनतेसाठी अत्यंत संवेदनशील असा विषय आहे, अनेक वर्ष देशात राजकारण सुरू आहे. नरेंद्र मोदी आल्यानंतर ते थांबेल, पण ते वाढतच चालले आहे. ‘द कश्मीर फाइल्स’मध्ये अनेक गोष्टी अशा आहेत, ज्या असत्य आहेत, ज्या घडलेल्या नाहीत, पण तो चित्रपट आहे. ज्यांना पाहायचा आहे ते पाहतील आणि ज्यांना खटकलं असेल ते बोलतील. तेवढे स्वातंत्र्य आपल्या देशात आहे. पण कश्मीर पंडितांसोबत शिखांनी सुद्धा बलिदान केले आहे. सुरक्षा दलातील मुस्लीम पोलिसांना देखील दहशतवाद्यांनी मारले आहे आणि कश्मीर पंडित सांगतात की त्यांचे प्राण वाचवायला अनेकवेळा मुस्लिम अधिकारी आले होते असं त्यांनी म्हटलं.
तसेच सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे काश्मिरी पंडितांची घरवापसी कधी होणार? काश्मीर मधल्या युवकांची बेरोजगारी कधी संपवणार आहात? काश्मीरमध्ये सर्वात मोठी गुंतवणूक कधी करणार आहात? सर्वात महत्त्वाचे म्हणजे पाकव्याप्त काश्मीर पुन्हा हिंदुस्तानाला कधी जोडत आहात? जे वीर सावरकर यांचे स्वप्न होते ते पूर्ण झाल्याचे आम्हाला या जन्मात पाहता येईल. राजकारण होते आणि राजकारण होऊ नये. काश्मीरच्या बाबतीत तरी हे राजकारण होऊ नये. राम मंदिराचा मुद्दा संपला असे आम्ही मानतो असं संजय राऊतांनी सांगितले.
दरम्यान, जर काश्मीरचा विषय कोणी काढत असेल तर ते काश्मीर या विषयाला पुन्हा एकदा विषाची उकळी देत आहेत. शिवसेना कधीही हिंदुत्व विसरणार नाही आणि विसरलेली नाही, हिंदुत्व कोण विसरले याचे आत्मचिंतन भारतीय जनता पक्षाने करावे. हिंदुत्ववादी शिवसेनेला दगा कोणी दिला त्याचे चिंतन त्यांनीच केले पाहिजे. आम्ही आमच्या हिंदुत्वाशी पक्के आहोत आणि जेव्हा जेव्हा गरज पडेल तेव्हा तेव्हा हिंदुत्वासाठी हातात तलवार घ्यायला आम्ही तयार आहोत असा इशाराही शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी दिला आहे.