मुंबई,दि.१२: शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांना पत्र लिहून मोठा दावा केला होता. महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकार पाडण्यासाठी मदत करण्यास नकार दिल्यानंतर ईडीने त्यांच्यासह कुटुंबीयांना त्रास देण्यास सुरुवात केली आहे. दिल्लीत संजय राऊत यांनी भारतीय जनता पार्टीवर जोरदार टीका केली होती.
शिवसेना खासदार संजय राऊत हे येत्या १५ फेब्रुवारीला शिवसेना भवनात पत्रकारपरिषद घेणार आहेत. यावेळी संजय राऊत (Sanjay Raut) भाजप नेते आणि ईडीच्या अधिकाऱ्यांमध्ये असलेल्या कथित संगनमताविषयी एखादा गौप्यस्फोट करण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता राजकीय वर्तुळाला संजय राऊत यांच्या पत्रकारपरिषदेची उत्सुकता लागली आहे.
गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत सक्तवसुली संचलनालयाच्या (ईडी) रडारवर आहेत. गेल्या काही दिवसांपासून संजय राऊत यांचे निकटवर्तीय असलेले प्रवीण राऊत आणि सुजीत पाटकर हे ईडीच्या कचाट्यात सापडलेले आहेत. या मुद्द्यावरुन संजय राऊतही अडचणीत येणार असल्याचा दावा भाजपचे नेते सातत्याने करत आहेत.
मात्र, संजय राऊत यांनी दोन दिवसांपूर्वीच दिल्लीतील पत्रकारपरिषदेत ‘ईडी’वर आगपाखड केली होती. महाराष्ट्रातील सरकार पाडण्यासाठी काहीजणांना माझ्याशी संपर्क साधला होता. मात्र, मी या कटात सहभागी होण्यास नकार दिल्याने ‘ईडी’च्या माध्यमातून मला लक्ष्य केले जात आहे. ईडीचे अधिकारी माझ्याशी संबंधित असलेल्या लोकांना त्रास देत आहेत. माझ्याविरुद्ध जबाब देण्यासाठी या लोकांवर दबाव आणला जात आहे. यासंदर्भात संजय राऊत यांनी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनाही पत्र पाठवले होते.
हे पत्र म्हणजे ट्रेलरही नाही, ट्रेलर अजून यायचा आहे. येत्या काही दिवसांमध्ये ईडीचे अधिकारी कशाप्रकारे सिंडिकेट चालवतात, हे मी उघड करेन. त्यासाठी मी शिवसेना भवनात आणि मुंबईतील ईडीच्या कार्यालयाबाहेर पत्रकारपरिषद घेईन, असा इशारा संजय राऊत यांनी दिला होता. त्यामुळे आता सर्वांनाच संजय राऊत काय बोलतात, याची उत्सुकता लागली आहे.