“मराठ्यांतील दुही, घरचेच वासे राज्याला काळ झालेले ही स्थिती…”

0

सोलापूर,दि.२: महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींवर दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी रोखठोक सदरातून जोरदार टीका केली आहे. सध्याच्या राजकारण्यांची मानसिकता आणि तुलना रोखठोक सदरातून केली आहे. दैनिक सामनाचे रोखठोक सदर जसेच्या तसे 

दिल्लीत मराठी साहित्य संमेलन व महाराष्ट्रात मराठी भाषा गौरव दिवस साजरा झाला, पण मराठी माणसाचा स्वाभिमान, बाणा या सगळ्यात हरवून गेला. महाराष्ट्राची सूत्रे पूर्णपणे दिल्लीच्या हातात आणि अमित शहांच्या भेटीसाठी महाराष्ट्राचे नेते पहाटे चार वाजेपर्यंत ताटकळत उभे आहेत. शिंदे-शहांत त्या ‘पहाटे’ काय घडले?

इतिहासाची पुनरावृत्ती सतत होत असते याची प्रचीती देणारा काळ सध्या महाराष्ट्रात चालू आहे. मराठ्यांतील दुही, घरचेच वासे राज्याला काळ झालेले ही स्थिती पाहून व्यथित मनाने शिवाजी महाराजांनी रायगडावर आपला देह ठेवला. त्यांची जयंती आणि पुण्यतिथी आपण साजरी करतो. 19 फेब्रुवारी रोजी शिवनेरीवर शिवरायांचा जन्मोत्सव साजरा झाला. तेथेही या दुहीचे दर्शन झाले. मुख्यमंत्री फडणवीस आणि उपमुख्यमंत्री शिंदे यांच्यातील कटुतेचे दर्शन किल्ले शिवनेरीवर झाले व दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार या सगळ्याची मजा घेत राहिले.

छत्रपती संभाजी यांच्यावरील ‘छावा’ चित्रपट सध्या सुरू आहे. दिल्लीच्या मराठी साहित्य संमेलनात पंतप्रधानांनी ‘छावा’ चित्रपटाचा विशेष उल्लेख केला तो मोगलांनी संभाजीराजांना कसे मारले ते पहा व भाजपला मते द्या, असे अप्रत्यक्ष सांगण्यासाठी. संभाजीराजांना पकडून देणारे व स्वराज्याची वाताहत करणारे फितूर आपलेच होते व त्यांना दिल्लीचा वरदहस्त होता हे स्वीकारले तर आज महाराष्ट्राच्या नशिबी पुन्हा तेच दुर्भाग्य आले आहे. महाराष्ट्र मनाने जातीपातीत दुभंगला आहे व त्याचा फायदा दिल्ली घेत आहे. स्वाभिमानासाठी ओळखले जाणारे महाराष्ट्र राज्य आज राजकारणाच्या मोहमायेमुळे शरणागत झालेले स्पष्ट दिसते.

महाराष्ट्रातील संपत्ती आणि उद्योग गुजरातमध्ये जात आहेत हे आता नित्याचेच झाले. ‘पेटंट’चे मुख्यालय मुंबईत होते. आठ दिवसांपूर्वी बातमी आली, हे ‘पेटंट’चे कार्यालयही आता दिल्लीत हलवले. एकदम अहमदाबादला नेले तर बोंब होईल म्हणून आधी दिल्लीत व नंतर अहमदाबादला नेले जाईल. बेळगावात मराठी लोकांवर नव्याने हल्ले सुरू आहेत व फडणवीस, शिंदे, पवार हे त्रिकूट त्यावर बोलायला तयार नाही. त्यामुळे मराठी भाषा दिन व पुरस्कार वितरण वगैरे सोहळे व्यर्थ आहेत. मंत्रालयातील कारभार पूर्णपणे मराठीतच चालावा असे नवे फर्मान मुख्यमंत्री फडणवीस यांनी पुन्हा एकदा काढले. त्याने काय होणार? ठाणे महापालिकेतील मराठी भाषेत पदवी मिळविणाऱ्या कर्मचाऱ्यांचे पगार कापण्याचे फर्मान एकनाथ शिंदे यांनी सोडले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here