RSSने ठरवलं तर मोदी सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहणार नाही

0

मुंबई,दि.14: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने (RSS) भाजपावर टीका केली आहे. RSS नेते इंद्रेश कुमार यांनी सत्ताधारी भाजपला ‘अहंकारी’ आणि विरोधी इंडिया ब्लॉकला ‘रामविरोधी’ म्हटले आहे. आता शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी आज पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर निशाणा साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून भाजपवर होणाऱ्या टीकेवरही भाष्य केलं.

काय म्हणाले संजय राऊत?

”लोकसेवकाला अहंकार नसावा असे वक्तव्य सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. मात्र गेल्या दहा वर्षात आपण या देशात फक्त अहंकार, इर्षा, सूडाचे राजकारण, सत्तेचा गैरवापर बघत आलो आहोत. भाजपची मातृसंस्था असलेली राष्ट्रीय स्वयंसेवक संस्था देखील हे सगळं बघत आली आहे. आम्हाला वाटलं होतं की संघाचे लोक निर्भयातेने समोर येऊन या अहंकाराचा विरोध करतील. ही आमची व जनतेची अपेक्षा होती. मात्र प्रत्यक्षात तसे काही झाले नाही.” असे संजय राऊत म्हणाले.

“1985 ला देशात इंदिरा गांधी यांनी आणिबाणी लावली होती. तेव्हाचे सरसंघाचालक बाळासाहेब दिरस होते. त्यावेळी त्यांनी त्या हुकुमशाहीला विरोध केला होता. त्यासाठी त्यांना तुरुंगात टाकले होते. हे आम्ही विसरू शकत नाही. या देशात लोकशाही टिकवण्याठी संघाच्या काही नेत्यांचे योगदान राहिले आहे. मात्र गेल्या दहा वर्षात संघाची एकदम विपरीत भूमिका आम्ही पाहिली आहे.” असेही राऊत म्हणाले.

RSSने ठरवलं तर मोदी सरकार

लोकशाहीत मतपेटीतून जनतेने अहंकाराचा पराभव घडवून आणला आहे. अद्याप ते पूर्णपणे पराजित नाही झाले्ले नाही त्यामुळे आता ते काम संघाला करावे लागेल. RSSने (संघाने) ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही. मोदींच्या अहंकारी सरकारला सुरुंग लावण्याचं काम जर संघ करत असेल तर ते त्यांचं राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत असं मी मानेन, असं संजय राऊत म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here