मुंबई,दि.26: अजय महाराज बारसकर यांनी पत्रकार परिषदेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. बारसकर यांनी यापूर्वीही मनोज जरांगे यांच्यावर आरोप केले होते. लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाचे शेकडोजण उमेदवारी अर्ज भरणार होते. मात्र मनोज जरांगे यांनी फक्त एकच उमेदवार उभा करायचा असा निर्णय घेतला.
यावरून अजय महाराज बारसकर यांनी अशोक चव्हाण यांच्यासोबत मनोज जरांगे यांची डील झाली आहे आणि त्यानुसार एकच उमेदवार उभा करण्याचा निर्णय घेतला आहे, असा आरोप केला आहे. त्याच बरोबर महाविकास आघाडी बरोबर मनोज जरांगे दुसरी डील करत आहेत, असा गंभीर आरोप बारसकर यांनी केला. या डीलनुसार जेथे महाविकास आघाडीचा उमेदवार असेल तेथे मराठा समाजाचा उमेदवार उभा करायचा नाही, अशी डील झाल्याचे बारसकर म्हणाले.
‘मनोज जरांगे यांची लढाई गोरगरीब मराठ्यांसाठी आणि लेकरबाळांसाठी नव्हती. ज्यांना ओबीसीच्या कोट्यातून सरपंच व्हायच होत. त्यांच्यासाठी जरांगे यांची ही लढाई होती. वाशीमध्ये ज्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडलं, त्याच्या आदल्या दिवशी ( जरांगे यांनी) मटण खाल्लं. देवेंद्र फडणवीस यांच्या घरी ज्यावेळी यायला निघालात त्यावेळी तुम्ही रात्री जेवण केलात’ असा आरोप अजय महाराज बारसकर यांनी केला आहे.
अशोक चव्हाण हे परवा रात्री तिकडे गेले, जरांगे यांना भेटले आणि माध्यमांना प्रतिक्रियाही दिली. तुम्ही म्हणाला होतात सीएम, डीसीएम सोबत फेसटाईमवर चर्चा केली आणि त्यावेळी मोबाईलवर मोबाईल ठेवून रेकॉर्डिंग केलं. अशोक चव्हाण यांच्या भेटीवेळी काय चर्चा झाली त्याच रेकॉर्डिंग जगासमोर आणा, असं बारसकर म्हणाले.