‘जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर…’ श्रीनिवास पवार यांची अजित पवारांवर टीका

0

बारामती,दि.18: उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर जोरदार टीका केली आहे. अजित पवार यांनी बंड करत राष्ट्रवादी पक्ष व चिन्ह मिळवले. बारामती लोकसभा मतदार संघातून अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार निवडूण लढणार आहेत. बारामती लोकसभा मतदार संघाचे खासदार सुप्रिया सुळे प्रतिनिधीत्व करत आहेत. अजित पवारांच्या निर्णयामुळे पवार कुटुंब हे खासदार शरद पवार यांच्या बरोबर आहे. अख्खे पवार कुटुंब शरद पवार यांच्या बरोबर आहे.

सुनेत्रा पवार यांच्याविरोधात आता बारामतीमधील संपूर्ण पवार कुटुंब उतरले आहे अशातच आता अजित पवार यांचे बंधू श्रीनिवास पवार यांनीही अजित पवार यांच्यावर निशाणा साधण्यास सुरुवात केली आहे. नालायक माणूस असा उल्लेख करत श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

अजित पवार यांनी घेतलेली भूमिका आपणास पटली नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही, ही गोष्ट वेदना देणारी आहे, असा घणाघाती हल्ला श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना काटेवाडीत बोलताना लगावला आहे.

जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर…

आमची जेव्हा चर्चा झाली, तेव्हा आमदारकीला तू आहे. खासदारकीला साहेबांना राहू दे, असे स्पष्ट आपण अजित पवार यांना सांगितले होते, असे श्रीनिवास पवार यांनी म्हटले. ते म्हणाले, साहेबांचे (शरद पवार) आपल्यावर खूप उपकार आहेत. काटेवाडीतील गावकरी म्हणून तुम्हाला हे सर्व माहीत आहे. त्यांचे 83 वय झाले म्हणून त्यांची साथ सोडणे मला पटले नाही. त्यांनी वयस्कर माणसांची किंमत केली नाही. आपणास दुसऱ्या माणसांकडून लाभ मिळणार आहे, यामुळे सोडणे चुकीचे आहे. जमीन आपल्या नावावर केली म्हणून त्यांना घराबाहेर काढायचे नसते, असे श्रीनिवास पवार यांनी अजित पवार यांना सुनावले.

नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते

“मी काही राजकारणी नाही मला जे पटत नाही ते मी करत नाही. माझ्या शाळेतील मित्र मला न सांगता गेले. आपण औषध घेतो त्याची एक्सपायरी डेट असते तशी काही नात्यांची देखील एक्सपायरी डेट असते. आता माझे वय 60 आहे मला दाबून जगायचे नाही. जगायची तर ताट मानेने व स्वाभिमानाने जगायचे आहे. केवळ कुणीतरी लाभार्थी आहे म्हणून त्याच्या पाठीमागे जायचे हे बरोबर नाही. मला नाही वाटत त्यांना सुद्धा झोप येत असेल,” असेही श्रीनिवास पवार म्हणाले.

घरातला कोणीतरी फोडल्याशिवाय…

“साहेबांनी काय केलं हा प्रश्न विचारला, ज्या साहेबांनी आपल्याला चार वेळा उपमुख्यमंत्री केले. 25 वर्ष मंत्री केलं. मला जर असा काका मिळाला असता तर मी खूष झालो असतो. भाजपने साहेबांना संपवायचा खूप खूप प्रयत्न केला. घरातला कोणीतरी फोडल्याशिवाय ते घर संपत नाही हे इतिहासामध्ये देखील आहे. घर एक असेल तर ते संपू शकत नाही. घरातला माणूसच घरच्यांना घाबरत नाही. माझे हे बोलणे रेकॉर्डिंग करत असाल तर मला देणे घेणे नाही. तुम्ही कोणाला पाठवायचे ते पाठवा. मी कुणालाही घाबरत नाही. मी कुणाकडेही लाभार्थी म्हणून जाणार नाही. मी इथून पुढे मनमोकळेपणाने बोलणार आहे. साहेब जर दहा वर्षांपूर्वीचे असते त्यांनी काय केले असते हे तुम्हाला हे ठाऊक आहे. वय वाढले म्हणून तुम्ही वयस्कर माणसाला कमजोर समजू नका. मधली जी आमची पिढी आहे ती जरा लाभार्थी झाली आहे. तरुण पोरं मात्र हा म्हणतात आम्ही बघून घेऊ काय करायचे ते. साहेब कधी कुणाला आवाज चढवून बोलले का?,वीस पंचवीस वर्ष साहेबांनी राज्य सोपवलं होतं आणि ते दिल्लीत होते. मी माझा कारखाना माझ्या मुलाकडे सोपवला आहे. वीस वर्षांनी जर मी तिकडे गेलो तर वॉचमनच मला सोडत नाही. आपण खेडेगावातली माणसं  आहोत, आपण मरेपर्यंत आई-वडिलांना सांभाळतो त्यांचा औषध पाणी करतो,” असेही श्रीनिवास पवार म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here