मराठा आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत राजेश टोपे यांचे स्पष्टीकरण

0

मुंबई,दि.27: मराठा आंदोलनावरून सत्ताधाऱ्यांकडून होणाऱ्या आरोपांबाबत शरद पवार गटाचे आमदार राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकेरी उल्लेख करत शिवराळ भाषेत टीका केल्यानंतर भाजपा आमदार आशिष शेलार यांनी विधानसभेमध्ये मनोज जरांगे पाटील यांची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मनोज जरांगे पाटील यांची SIT चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत.

विधानपरिषदेमध्ये आमदार प्रवीण दरेकर यांनी आशिष शेलार यांचाच मुद्दा उचलून धरत जरांगेवर गुन्हा दाखल करुन त्यांना अटक करावी अशी मागणी केली आहे. विधान परिषदेत मनोज जरांगे यांच्या आंदोलनामागे शरद पवार यांचा हात असल्याचा आरोप करत, आमदार राजेश टोपे यांच्या कारखान्यावर आंदोलनाचे षडयंत्र रचले जात होते, असा गंभीर आरोप प्रविण दरेकर यांनी केला आहे. दरेकर यांनी आमदार रोहित पवार यांचंही नाव घेतलं.  

प्रविण दरेकर यांनी केलेल्या आरोपाबाबत राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिले आहे. प्रविण दरेकर यांनी केलेल्या आरोपात सत्यता नसल्याचे टोपे यांनी सांगितले. ‘मी दंगल घडवणारा, दगडफेक करणारा माणूस नाही, दगडफेकीला प्रोत्साहन देणारा माणूस नाही. अशा प्रकरणात खरंच एसआयटी नेमायला हवी का? हा प्रश्न आहे. मात्र आता एसआयटीमधून सर्व चित्र स्पष्ट होईल. जरांगे पाटलांच्या आंदोलनाला आम्ही दोन-दोन वर्षे यापूर्वी सामोरे गेलो आहोत. त्यावेळी आम्ही पोलीस प्रशासनाला आणि जिल्हाधिकाऱ्यांना संयमाने आणि सबुरीने हे आंदोलन हाताळण्याच्या सूचना देत होतो.’ असे राजेश टोपे म्हणाले.

‘जर चौकशीला बोलावलं तर मी जाणार, माझा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही. माझ्या कारखान्यात अनेकजण राहतात मुख्यमंत्र्यांचे हेलिकॅाप्टर तिथं उतरले होते मग काय म्हणायचे? सर्व रेकॅार्ड निश्चित समोर आणावेत. मी एक टक्के जरी काही चुकीचे केलेले असेल तर मी राजकीय संन्यास घेईन.’ असे टोपे म्हणाले.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here