अहमदनगर,दि.24: एसटी बस, कार आणि ट्रॅक्टर अपघातात 6 जण ठार झाले आहेत. नगर कल्याण महामार्गावर एसटी बस, कार आणि ऊस वाहतूक करणारा ट्रॅक्टर अशा तीन वाहनांची धडक होऊन भीषण अपघात झाला. बुधवारी (दि.24) पहाटे 2.30 च्या सुमारास हा अपघात झाला. यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. यापैकी पाच जणांचा जागीच मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह पारनेर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तर एकाचा अहमदनगर येथे उपचार चालू असताना मृत्यू झाला आहे.
सहायक पोलिस निरिक्षक प्रमोद वाघ आणि टीम घटना स्थळी दाखल झाली असून अपघातग्रस्तांना तातडीने मदत करण्यात आली. या अपघातात अनेकजण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अपघातामुळे वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.
निलेश रावसाहेब भोर (दसवडे), जयवंत रामभाऊ पारधी (जांबुत खुर्द), संतोष लक्ष्मण पारधी (जांबुत खुर्द), प्रकाश रावसाहेब थोरात (वारणवाडी), सचिन कांतीलाल मंडलीचा (टाकळी मानूर), अशोक चिमा केदार (जांबुत खुर्द) अशी मृत्यू झालेल्यांची नावं आहेत. तर, सुयोग अडसूळ नावाचा तरुण या अपघातात जखमी झाला आहे.
कल्याण निर्मल महामार्गावर उस वाहतुक करणारा ट्रक्टर व ठाणे–मेहकर एस.टी बस आणि इको गाडी यांची ढवळपुरी फाटया जवळ पहाटेच्या सुमारास जोरदार धडक झाली. त्यामध्ये सहा जण जागीच ठार झाले. अपघात इतका भीषण होता, की यामध्ये तिन्ही वाहनांचा अक्षरश: चक्काचूर झाला. या भयानक घटनेत 6 जणांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच पोलिसांसह परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली.