नवी दिल्ली,दि.२४: चीनमध्ये H9N2 चा प्रादुर्भाव वाढला असून तेथील लहान मुलांमध्ये श्वसनाच्या तक्रारी वाढल्या आहेत. कोरोनाप्रमाणे हा सुद्धा संसर्गजन्य आजार असल्याने भारतीय नागरिकांमध्येही घबराट निर्माण झाली आहे. परंतु, केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. चीनमध्ये आढळललेले एव्हीयन इन्फ्लूएन्झा (H9N2) चा भारताला कमी धोका असल्याचं केंद्र सरकारने म्हटलं आहे. जागतिक आरोग्य संघटनेनेही याप्रकरणी चीनची चौकशी केली. याच दरम्यान, भारत सरकारही या आजाराबाबत सतर्क झाले आहे. या आजारावर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शुक्रवारी एका निवेदनात म्हटलं आहे की भारत चीनमधील मुलांमध्ये निमोनियाच्या नोंदलेल्या प्रकरणांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे आणि कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी तयार आहे. भारताला धोका कमी असल्याचे सांगण्यात आले आहे. पण चीनमध्ये ज्या वेगाने हा आजार मुलांमध्ये पसरत आहे त्यामुळे लोकांची चिंता वाढली आहे.
जगालाही याची चिंता आहे. कारण लहान मुलांचा हा आजार जर कोरोनासारखा जगात पसरला तर परिस्थिती किती धोकादायक असेल याची कल्पनाही करणे कठीण आहे. जगातील अनेक देश यासाठी अलर्ट झाले आहेत. लहान मुलांमधील रहस्यमयी न्यूमोनियामुळे भारत सतर्क आहे. आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, भारतात तापाच्या प्रकरणांवर लक्ष ठेवण्यात आले आहे.
DGHS च्या देखरेखीखाली आरोग्य मंत्रालयात बैठक झाली आहे. सरकारने सध्या कोणत्याही प्रकारची चिंता नाकारली आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, ऑक्टोबरमध्ये चीनमध्ये एवियन इन्फ्लूएंझाची प्रकरणे आढळल्यानंतर भारतातील सिस्टमची पुन्हा तपासणी करण्यात आली आहे. हा आजार भारतात येण्याची शक्यता कमी आहे. दुसरीकडे, WHO ने चीनमधील वाढत्या प्रकरणांवर चिंता व्यक्त केली आहे.
चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्ये H9N2 (एव्हियन इन्फ्लूएन्झा विषाणू) चा संसर्ग एका व्यक्तीला झाल्याचे आढळून आले. त्यानंतर हा संसर्ग वाढत गेला. परिणामी, या आजाराविरोधात लढण्यासाठी आरोग्य सेवा महासंचालनालयाच्या अध्यक्षतेखाली चीनमध्ये नुकतीच एक बैठक आयोजित करण्यात आली होती. याचा अहवाल जागतिक आरोग्य संघटनेला देण्यात आला. आरोग्य संघटनेने केलेल्या एकूण जोखीम मूल्यमापनात त्यांच्याकडे आतापर्यंत नोंदवलेल्या H9N2 च्या मानवी प्रकरणांमध्ये मनुष्याकडून दुसऱ्या मनुष्याकडे संसर्ग पसरण्याची शक्यता कमी असून मृत्यूचे प्रमाण कमी असल्याचे आढळले आहे. म्हणजेच, या आजाराचा संसर्गजन्य दर आणि मृत्यूचे प्रमाण कमी आहे.