मनोज जरांगे पाटील यांचा बॅनर फाडला, गुन्हा दाखल

0

छत्रपती संभाजीनगर,दि.18: मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा बॅनर फाडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गवळी शिवरा परिसरात मनोज जरांगे पाटील यांचा फोटो असलेला साखळी उपोषणाचा बॅनर लावण्यात आला होता. या बॅनरवरील मनोज जरांगे यांच्या फोटो अज्ञात इसमाने फाडला आहे. खोडसाळपणा करून हे बॅनर फाडल्या प्रकरणी शिल्लेगाव पोलिस स्थानकात तक्रार दाखल करण्यात आली आहे. हा खोडसाळपणा कोणी केला याचा पोलीस शोध घेत असून यामुळे यामुळे राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे.

विशेष म्हणजे ओ.बी.सी. एल्गार (OBC Sabha) मेळाव्यात बोलताना मंत्री छगन भुजबळ ( Chhagan Bhujbal) यांनीचं मराठा समाजाचे (Maratha Reservation) आरक्षणाचे बॅनर काढण्याचे वक्तव्य केले होते. त्यामुळेचे बॅनर फाडण्यात आल्याचा आरोप पोलिसांच्या एफआयआरमध्ये करण्यात आला आहे. तर,संदीप भाऊसाहेब औताडे यांच्या तक्रारीवरून अज्ञात व्यक्ती विरोधात हा गुन्हा दाखल झाला आहे. मात्र, थेट भुजबळ यांचे एफआरमध्ये नाव आल्याने त्यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.

तक्रारदाराने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी अंदाजे दुपारी 2.30 च्या सुमारास हा बॅनर फाडण्यात आला. पवन केरे यांनी फोनद्वारे बॅनर फाडल्याची माहिती दिली. नागपूर ते मुंबईला जाणाऱ्या रस्त्यावरील आरापूर शिवारातील गवळी शिवरा कमानीजवळ मराठा योध्दा मनोज जरांगे पाटील यांचा साखळी उपोषणाचे बँनर फाडण्यात आले आहे. याची माहिती मिळताच बबनराव डुबे पाटील, संदीप जालींदर औताडे यांच्यासह दुपारी 3 च्या सुमारास पाहणी केली. बँनरवरील मनोज जरांगे पाटील आणि साखळी उपोषणाचा मजकूर फाडून बॅनरचे नुकसान केल्याचे दिसले. त्यानंतर ठाणे शिल्लेगाव पोलिस स्थानकात येऊन तक्रार दाखल केली.

भुजबळांवर कारवाई करण्याची मागणी

जालन्यातील ओबीसी मेळाव्यात मार्गदर्शन करताना छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर खालच्या पातळीवर जाऊन टीका केली. दोन समाजात तेढ निर्माण होईल अशा प्रकारचे वक्तव्य केले. एवढच नाही तर त्यांनी महाराष्ट्रामध्ये गावोगावी लावलेले मराठा समाजाचे आरक्षणाचे बँनर काढून टाका अशा प्रकारचे चिथावणीखोर वक्तव्य जाहीर सभेत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतरच बॅनर फाडल्याचा दावा तक्रारदाराने केला आहे. सर्व प्रकरास छगन भुजबळ हे जबाबदार असून त्यांच्या विरुद्ध प्रक्षोभक भाषण करुन दोन समाजात तेढ निर्माण करणे, जातीय सलोखा बिघडवणे, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करुन सकल मराठा समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप केला आहे. मंत्री छगन भुजबळ यांचे विरुध्द कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here