जालना,दि.१८: आमदारांना गावबंदी, खासदारांना गावबंदी! महाराष्ट्र काय तुमच्या सात बारावर लिहून दिलाय का? हे गावबंदीचे फलक ताबडतोब हटवले पाहिजेत. हे लोकशाहीचे राज्य आहे. असे अजित पवार गटाचे नेते मंत्री छगन भुजबळ यांनी म्हटले आहे. काल अंबड येथे ओबीसी एल्गार सभा झाली.
आज मराठा समाजाचा नेता निर्माण झाला आहे. त्यांचे म्हणणे आहे की, धनगर, माळी, तेली हे मध्येच घुसले. त्यांना अभ्यास कळत नाही. आम्हाला आरक्षण घटनेने दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिले. मंडल आयोगाने दिले. नऊ न्यायमूर्तींनी त्यावर शिक्का मारला. आम्ही हक्काचे खातो, सासरच्या घरी तुकडे मोडत नाही, असे टीकास्त्र मंत्री तथा ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे-पाटील यांचे नाव न घेता सोडले.
दगडाला शेंदूर लावून हा कुठला देव झाला? महाराष्ट्र तुमच्या सातबारावर लिहिला का? असा सवाल करीत दादागिरी चालू देणार नाही, गावबंदीचे फलक शासनाने हटवावेत, अशी मागणीही भुजबळांनी केली. अंबड (जि. जालना) येथे शुक्रवारी दुपारी आयोजित ओबीसी, भटके विमुक्त आरक्षण बचाव एल्गार सभेत मोठ्या संख्येने सहभागी झालेल्या ओबीसी समाजबांधवांना ते संबोधित करत होते. व्यासपीठावर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, महादेव जानकर, आ. गोपीचंद पडळकर, प्रकाश शेंडगे, नारायण मुंडे, बबनराव तायवाडे, आ. राजेश राठोड, देवयानी फरांदे व इतर ओबीसी नेत्यांची उपस्थिती होती. माझ्या शेपटीवर पाय देण्याचा प्रयत्न करू नका, असा इशाराही भुजबळांनी दिला.
१०० एकर मैदान तुडुंब
अंबड येथील १०० एकर मैदान गर्दीने तुडुंब भरले होते. रस्त्यावरही गर्दी होती. शहराच्या विविध भागांताल पार्किंग परिसर अपुरे पडल्याने वाहने रस्त्यांवर लावण्यात आली होती.
कोड नंबर देऊन हल्ले
बीडमध्ये झालेले हल्ले कोड नंबर देऊन झाले होते. अनेक ग्रुप होते. पेट्रोल बॉम्ब तयार होते. चॉपर तयार होते. ४००-४०० जणांच्या जमावाने हल्ला केला, असे भुजबळ म्हणाले.