बाकी पक्षातील नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का? : जयंत पाटील

0

रत्नागिरी,दि.३०: बाकी पक्षातील नेते धुतल्या तांदळासारखे आहेत का? असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी भारतीय जनता पार्टीवर टीका केली आहे. जयंत पाटील हे परिवार संवाद दौऱ्याच्या निमित्ताने रत्नागिरीतील गणपतीपुळे येथे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्यावरही सडकून टीका केली.

भारतात १२० कोटी लोकसंख्या असतानाही केंद्रीय यंत्रणेला केवळ महाराष्ट्रातील आणि त्यांच्याविरोधी बोलणारे, त्यातही केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि काँग्रेस या पक्षातील नेते दिसत आहेत. बाकी पक्षातील नेते हे धुतल्या तांदळासारखे आहेत. भाजपमधील खासदारच सांगतात की, आता आम्हाला रात्रीची शांत झोप लागते. म्हणजेच भाजपात तुम्ही गेलात की सगळ्याला अभय आहे. परंतु, विरोधात आवाज उठवला की त्यांची दहा-वीस वर्षांपूर्वीची कागदं काढायची आणि चौकशीचा ससेमिरा सुरू करायचा, रेड टाकायची, त्यांची बदनामी करायची हे काम केंद्रीय यंत्रणा करतेय हे दुर्दैवी आहे, असेही जयंत पाटील म्हणाले.

‘चंद्रकांतदादा हल्ली झोपेतही बोलतात असे कानावर आले आहे. त्यामुळे त्यांचे बोलणे जास्त मनावर घेऊ नका’, अशा शब्दांत जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला. यावेळी नवाब मलिक आणि समीर वानखेडे यांच्यातील वादाबाबतही पाटील यांनी भाजपला खरमरीत सल्ला दिला.

पत्रकारांनी चंद्रकांत पाटील यांच्या टीकेवर व इतर प्रश्नांवर प्रतिक्रिया विचारली असता जयंत पाटील यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे राज्य सरकारवर टीका करत आहेत मात्र त्यांना इतके महत्त्व देण्याची आवश्यकता नाही, असे पाटील म्हणाले.

भाजपाने एका अधिकाऱ्याच्या बाबतीत एवढे गांभीर्याने घेण्याची गरज नाही. नवाब मलिक हे जी काही माहिती उघड करत आहेत त्याला समीर वानखेडे उत्तर देतील. त्यात तिसऱ्याने पडण्याचे कारण नाही, असे पाटील म्हणाले. समीर वानखेडेंच्या जातीच्या प्रमाणपत्रावर राज्यातील सामान्य माणसाला निर्माण झालेली शंका किंवा आर्यन खान याच्यावरील कारवाईबाबत नवाब मलिक यांनी दिलेल्या माहितीत अनेक गंभीर बाबी उघड झाल्या आहेत. यात समीर वानखेडे आणि नवाब मलिक हे येत्या काळात आपापली भूमिका ठेवतील. यामध्ये पडून भाजपने त्यांचा कार्यक्रम करण्याची आवश्यकता नाही, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here