Tanaji Sawant: तानाजी सावंत यांचा खळबळजनक दावा, जे बाळासाहेब, वाजपेयींना जमलं नाही…

0

सोलापूर,दि.29: शिंदे गटाचे मंत्री तानाजी सावंत (Tanaji Sawant) यांनी खळबळजनक दावा केला आहे. आरोग्यमंत्री तानाजी सावंत (Health Minister Tanaji Sawant) यांनी अतिशय धाडसी वक्तव्य केलं आहे. ज्या मैदानावर बाळासाहेब ठाकरे, अटल बिहारी वाजपेयींना गर्दी जमवता आली नाही, तिथं सावंत बंधूंनी सात लाखांची गर्दी जमवून दाखवली, असं तानाजी सावंत एका कार्यक्रमात म्हणाले. मोठेपणाच्या ओघात आरोग्यमंत्री बोलून गेले असले तरी त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार हे स्पष्ट आहे.

बाळासाहेब ठाकरे आणि वाजपेयींपेक्षा आपण मोठे आहोत, हे सावंत यांनी एका वाक्यात सुचवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे एकीकडे शिवसेना तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह संपूर्ण भाजपचा रोष त्यांनी ओढावून घेतला असल्याची चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

पंढरपूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी हे विधान केलं आहे. मंगळवारी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात बोलताना तानाजी सावंत यांनी आपल्या सभांना बाळासाहेब ठाकरेंच्या सभेपेक्षाही जास्त गर्दी जमल्याचा दावा केला.

जे बाळासाहेब वाजपेयींना जमलं नाही…

ज्या ठिकाणी स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना सभेला गर्दी जमवता आली नाही त्या पंढरपूरमध्ये या सावंत बंधूनी 7 लाखांचा मेळावा घेण्याची कमाल घडवून आणली अशी दर्पोक्ती एका कार्यक्रमात बोलताना आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी करत सावंत बंधू या नेत्यांपेक्षा किंवा भाजप, शिवसेनेपेक्षा कसे मोठे आहेत? हे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे.

जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर…

काल (मंगळवारी) रात्री वडार समाज मंदिराच्या उद्घाटन समारंभासाठी आरोग्यमंत्री तानाजी सावंत आले होते. ठरलेल्या वेळेपेक्षा चार तास उशिरा कार्यक्रम सुरु झाला खरा, मात्र आरोग्यमंत्र्यांनी भाषणबाजीत सर्वात आधी देशाच्या आदरणीय नेत्यांसोबतच आपली तुलना केल्यानं उपस्थितीतांमध्ये देखील अस्वस्थता सुरु झाली. यानंतर त्यांनी आपल्याला सोलापूरचे पालकमंत्रीपद मागत होतो, असे सांगत जर मला सोलापूरचं पालकमंत्री केलं तर किती अनुदान मिळतं, हे दाखवून दिलं असतं, असं सांगत तानाजी सावंतांनी भाजपच्या राधाकृष्ण विखे पाटील यांना टोलाही लगावला आहे.

दरम्यान, या कार्यक्रमात हे सर्व सांगताना आरोग्यमंत्र्यांनी धडधडीत खोटी माहिती देत सर्वांची फसवणूक देखील केली आहे. स्वर्गीय शिवसेनाप्रमुख हे एकदाच 1990 साली पंढरपूरला आले होते आणि त्यांनी त्यांची विराट सभा रेल्वे मैदानावर घेतली होती. ही सभा इतकी मोठी झाली की, त्या सभेनं पूर्वीचं सर्व विक्रम मोडले होते. यांनतर स्वर्गीय पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी आरोग्यमंत्री सांगतात त्या नवीन स्टँडच्या मैदानावर धनगर मेळावा घेतला होता आणि हा मेळावा देखील विराट झाला होता. आरोग्यमंत्री ज्या 2017-2018 च्या शिवसेना मेळाव्याबाबत सांगतात तो मेळावा उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत संपूर्ण महाराष्ट्रातील शिवसैनिकांचा झाला होता. या मेळाव्यासाठी संपूर्ण राज्यभरातून हजारोंच्या संख्येनं शिवसैनिक सोलापुरात जमले होते. आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यानंतर शिवसेना आणि भाजप या दोन्ही पक्षातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात होणार असल्यानं तानाजी सावंत हे पुन्हा एकदा आपल्या वक्तव्यामुळे अडचणीत येणार असून आता तर त्यांना स्वकीयांच्याच रोषाला सामोरं जावं लागणार असल्याचं स्पष्टच दिसत आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here