मुंबई,दि.२६: Ramdas Athawale On Sharad Pawar: केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांना ऑफर दिली आहे. आठवले यांनी नागालँडचे उदाहरण देत पवारांना ऑफर दिली आहे. आताच्या घडीला विविध मुद्द्यांवरून महाविकास आघाडी आणि भाजप-शिंदे गटात आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना पाहायला मिळत आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचे पाहायला मिळाले. यातच आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांना खुली ऑफर दिली आहे. रामदास आठवलेंनीशरद पवारांना दिलेली ऑफर देशाच्या राजकारणात उलथापालथ करणारी ठरू शकते, असे सांगितले जात आहे.
प्रसारमाध्यमांशी बोलताना केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी अनेकविध विषयांवर सविस्तर भाष्य केले. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द झाल्यासंदर्भात प्रतिक्रिया देताना रामदास आठवले म्हणाले की, राहुल गांधी यांच्यावरील कारवाई योग्य आहे. राहुल गांधी कायद्यापेक्षा मोठे नाहीत. राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईशी भाजपचा संबंध नाही. राहुल गांधी यांनी सांभाळून बोलले पाहिजे. पंतप्रधान मोदी यांच्यावर टीका करून काँग्रेसचा फायदा होत नाही आणि पक्ष वाढत नाही, असा खोचक टोला रामदास आठवले यांनी यावेळी बोलताना लगावला.
रामदास आठवलेंची शरद पवारांना ऑफर | Ramdas Athawale On Sharad Pawar
रामदास आठवले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना थेट एनडीएमध्ये येण्याची ऑफर दिली. शरद पवारांनी आता एनडीएसोबत यावे. नागालँडप्रमाणे देशाच्या विकासासाठी शरद पवारांनी एनडीएसोबत यावे. शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांचे चांगले संबंध आहेत. पंतप्रधान मोदींनी शरद पवारांचे अनेकदा कौतुक केले आहे. त्यामुळे या दोन्ही नेत्यांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे, असे रामदास आठवले यांनी सांगितले.
दरम्यान, गुढीपाडव्याला झालेल्या राज ठाकरे यांच्या सभेबाबत बोलताना रामदास आठवले म्हणाले की, राज ठाकरे हे गर्दी जमवण्यात एक्स्पर्ट आहेत. राज ठाकरेंनी भोंग्यांचा मुद्दा वाढवू नये. भोंगे काढण्यापेक्षा मंदिरावर भोंगे कसे लावता येतील ते बघावे. भोंग्याना विरोध करू नये. राज ठाकरे यांनी चांगले काम करून आपला पक्ष वाढवावा, असा सल्ला देताना, बाळासाहेब ठाकरे असते तर उद्धव ठाकरेंवर ही वेळ आली नसती. शिवसेना घालवण्यात उद्धव ठाकरे आणि संजय राऊत हे जबाबदार आहेत, अशी टीकाही रामदास आठवले यांनी केली.