बेळगाव,दि.15: Border Dispute: कर्नाटक सरकारच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. अज्ञातांनी दगडफेक केली आहे. महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद चिघळला असताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी काल बैठक घेतली. कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमेवर वाद मिटवण्यासाठी नवी दिल्लीत खुद्द केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची बैठक घेतली. पण, बैठक होऊन 24 तास होत नाही तेच बेळगावमध्ये अज्ञातांनी कर्नाटक सरकारची गाडी फोडली आहे. या घटनेमुळे तणाव निर्माण होण्याची चिन्ह आहे.
कर्नाटक सरकारच्या गाडीवर दगडफेक | Border Dispute
आज दुपारी बेळगावमध्ये कर्नाटक सरकारच्या गाडीवर हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात तरुणांनी कर्नाटक सरकारची गाडी फोडली. अधिवेशनाच्या कामासाठी ही गाडी आली होती. हलग्याजवळ गाडीवर 5 अज्ञात व्यक्तींची दगडफेक केली. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. पाच तरुण दगडफेक करून फरार झाले. सुदैवाने या घटनेमध्ये कुणाला दुखापत झाली नाही. पण, या घटनेचे पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

सीमावादावर बैठक
विशेष म्हणजे, कर्नाटक आणि महाराष्ट्र सीमावादावर दिल्लीत अखेरीस तोडगा काढण्यात आला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाखाली ही बैठक झाली, याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. ही बैठक सकारात्मक झाल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितलं, तसंच या बैठकीत झालेल्या निर्णयांबाबतही अमित शाह यांनी माहिती दिली.
सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य दावा करणार नाहीत

‘महाराष्ट्र आणि कर्नाटकचे 3-3 मंत्री बसतील आणि चर्चा तसंच चिंतन करतील. दोन राज्यांमध्ये अनेक छोटे छोटे मुद्दे आहेत, जे शेजारी राज्यांमध्ये नेहमी असतात. या मुद्द्यांचं निवारण 3-3 मंत्री करतील. दोन्ही राज्यांमध्ये कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न नीट राहील. अन्य भाषेच्या लोकांना तसंच प्रवाशांना, व्यापाऱ्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये, यासाठी सिनियर आयपीएस अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली दोन्ही राज्य कमिटी बनवण्यासाठी सहमत झाल्या आहेत. ही समिती संविधानाच्या अखत्यारीत कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रयत्न करेल. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्य दावा करणार नाहीत’, असं अमित शाह म्हणाले.