मुंबई,दि.2: महाराष्ट्रात दोन ठिकाणी सोन्याच्या खाणी (Gold Mines in Maharashtra) आढळल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी दिली आहे. महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याची शक्यता वर्तवली गेली आहे. खुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या दृष्टीने शोध घेण्याचं काम सुरु असल्याचीही माहिती दिली.
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात सोन्याच्या खाणी सापडल्याची माहिती समोर येत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील मिंझरी आणि बामणी या भागात सोन्याच्या दोन खाणी आढळून आल्या आहेत. याबाबत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही प्रतिक्रिया दिला आहे.
![](https://solapurvarta.in/wp-content/uploads/2022/12/IMG-20221127-WA0007-2-1024x831.jpg)
चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोळशाच्या खाणी आहेत. त्यानंतर आता भूगर्भात तांबे आणि सोन्याच्या खाणीही आहेत. केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याची माहिती राज्याच्या खनिकर्म विभागाकडून देण्यात आली आहे. त्यादृष्टीने खनिकर्म विभागाने चाचणी सुरू केली आहे.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यातील चंद्रपूर आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये सोन्याच्या खाणी असण्याबाबतच्या माहितीला दुजोरा दिला. राज्याच्या भूगर्भात कोळसा, बॉक्साईट, आर्यन या खनिजांसोबत सोनंही असू शकतं, असं आता बोललं जातंय. याबाबत केंद्र सरकारच्या खनिकर्म विभागाचा अहवाल असल्याचंही सांगितलं जातंय. या दृष्टीने आता चाचणीही सुरु करण्यात आल्याचं कळतंय.
महाराष्ट्रात सोन्याचे दोन ब्लॉक आहेत, अशी माहिती केंद्रीय अधिकाऱ्यांनी दिल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलंय. शिंदे-फडणवीस सरकारच्या काळात हे सोनं निघालं तर ती महाराष्ट्रासाठी मोठी उपलब्धी असेल, असंही त्यांनी यावेळी म्हटलं. सोन्याचे हे दोन ब्लॉक विदर्भातील चंद्रपूर आणि कोकणतील सिंधुदुर्ग या जिल्ह्यात असल्याचंही सांगितलं जातंय.